विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
युवा पिढीला सर्वाधिक प्रोत्साहन देणारे, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी झटणारे नेते म्हणून राजीव गांधी यांचे नाव सदैव स्मरणात राहील. त्यांच्या या कार्यामुळेच देशात मोफत शिक्षणाचा पाया घातला गेला. कितीतरी विद्यापीठे उभी राहिली, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले. राजीव गांधी यांनी गोव्यासाठी दिलेल्या योगदानाचे प्रत्येक गोमंतकीयाने स्मरण ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 31व्या पुण्यतिथीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पणजीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात लोबो बोलत होते. त्यावेळी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, पक्षाध्यक्ष अमित पाटकर, आमदार रुडाल्फ फर्नांडिस, शंभू भाऊ बांदेकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, आमदार डिलायल लोबो यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. राजीव गांधी यांच्या तसबिरीस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली.
काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल ः सार्दिन
खासदार सार्दिन यांनी बोलताना, यापूर्वी काँग्रेसने केलेली कामे आणि मार्गी लावलेल्या योजनांच्याच नावात बदल करून ज्या योजनांच्या बढाया भाजप मारत आहे तो प्रकार म्हणजे ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ असा आहे, अशी टीका केली. हे सर्व पाहता राज्यातील जनता भाजपला कंटाळली असल्याचे स्पष्ट असून परिणामस्वरूप काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱया अर्थाने आयटी क्रांती आली. त्यांच्या योगदानाची दखल जागतिक नेत्यांनी घेताना त्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नांमुळेच गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला, पंचायतींमध्ये आरक्षण आले, असे सार्दिन पुढे म्हणाले.
राजीव गांधी यांनी देशासाठी केलेले कार्य, त्याग, त्याची दूरदृष्टी तसेच गोव्याच्या विकासात दिलेले योगदान यांचे सर्व वक्त्यांनी स्मरण केले. त्यांची सर्व अपुरी स्वप्ने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पक्षाध्यक्ष श्री. पाटकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, श्री. बांदेकर यांनीही विचार मांडले.
दरम्यान, पणजीतील कार्यक्रमापूर्वी सर्व मान्यवरांनी बांबोळी येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.