जळगाव/प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे, अशी माहिती आहे. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी विधानपरिषद च्या १२ आमदारांच्या यादीतून कुणाचेही नाव वगळले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांनी नुकताच चाळीसगावसहीत पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.चाळीसगावसहीत पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केल्यांनतर मंत्री जयंत पाटील
म्हणाले, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीनेचं राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर लवकर निर्णय घावा अशी तिन्ही पक्षांची अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत, असे महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले आहे. बराच काळ झाला त्याच्यावरचा निर्णय येत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान,बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, “मी, मुख्यमंत्री महोदय, बाळासाहेब थोरात, आणि राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना भेटलो. प्रोटोकॉलनुसार राज्यपालांची भेट घेतली जाते. त्यासाठी आम्ही भेटलो. पावसानं राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राज्यातील कोरोनाची स्थिती याबाबत चर्चा केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत प्रश्न केला असता, अजित पवार म्हणाले की, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबतचा ठराव हा कॅबिनेटने केला होता. परंतु त्यानंतर पुढची कार्यवाही झालेली नाही. म्हणून याबाबत विनंती करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो. त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, असे सांगून आम्ही राज्यपालांना कार्यवाही करण्याबाबत विनंती केली.