प्रतिनिधी / सांगली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमाभरपाई द्यायला लागू नये म्हणून कशी बोगसगिरी करतात याचे एक प्रकरण उघडकीस आणले आहे. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालणार की त्यांचेही काही वाटे आहेत? असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा न देता काही ना काही कारण सांगून कंपन्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचे टाळत असतात. गत हंगामात अशाच पद्धतीने साडे पंधरा हजार कोटी रुपयांना नफ्यात राहिलेल्या कंपन्यांनी यावर्षीही आपली बोगसगिरीची परंपरा कायम ठेवली आहे.
सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी वाटसांगवी ता. भूम येथील गट नंबर 136 वरील शेतकरी किरण शिंदे यांच्या सोयाबीनच्या शेताला भेट दिली. शिंदे यांच्या शेतातील सोयाबीनची अद्याप कापणी झालेली नसताना कंपनीने बोगस कापणी अहवाल दाखवून त्यांच्या शेतात अर्ध्या गुंठ्याला दहा किलो पेक्षा जास्त सोयाबीन उत्पन्न आले असा अहवाल तयार करून वेबसाईटवर जारी केला आहे. या तालुक्याचे उंबरठा उत्पादन आठ किलो सहाशे ग्राम असताना त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन या शेतकऱ्याच्या शेतात झाले असे दाखवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. या अहवालाच्या आधारावर त्यांच्या सर्कलमधील सर्व शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे क्लेम कंपनीने नाकारले आहेत. प्रत्यक्षात शिंदे यांच्या शेतातील सोयाबीनची कापणी झालेलीच नाही. नियमानुसार अशा पद्धतीचा कापणी अहवाल तयार करायचा असेल तर संबंधित शेतकरी, सरपंच, तलाठी आणि कंपनीचा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अहवाल तयार करावा लागतो. म्हणजे प्रत्यक्षात किती उत्पादन झाले हे समजू शकते.
मात्र शिंदे यांच्या अष्ठ्यात्तर गुंठे शेतात कापणी कापणीच झाली नसताना खोटा अहवाल तयार करून संपूर्ण सर्कलचा क्लेम नाकारला गेला आहे. पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अशाच पद्धतीने लुबाडत असताना, मुख्यमंत्री, कृषीमंत्री याकडे लक्ष देणार आहेत की त्यांचाही यामध्ये काही वाटा आहे? हे जाहीर करावे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. गत आठवड्यात गुलाब चक्रीवादळाचा दुष्परिणाम मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र आदी भागातील शेतकऱ्यांवर झाला असून तीन ते अकरा वेळा अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर जमीनही खरवडून गेली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला न येता बोगस अहवालाद्वारे पिक विमा नाकारण्याच्या कंपन्यांच्या बोगसगिरीला राजू शेट्टी यांनी चव्हाट्यावर आणले आहे.