पुणे / प्रतिनिधी :
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि माझ्यामध्ये सोशल डिस्टन्स आहे. मी राज्याचे प्रश्न बघतो ते देशाचे बघतात, असे मत माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे.
रविवारी खोत यांनी राज्यातील शेतीच्या प्रश्नावर झूम ॲपद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण राजू शेट्टी यांच्याशी बोललात का एकत्र येऊन काही आंदोलन होणार आहे का असे पत्रकारांनी खोत यांना छेडले. यावर खोत यांनी दिलखुलासपणे आमच्या दोघांमध्ये सोशल डिस्टन्स आहे तो तसाच राहू द्या, असं सांगितले. राज्याचे प्रश्न तुम्ही आणि केंद्रस्तरावर शेट्टी यांनी अशी काही वाटणी झाली आहे, का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना केला. त्यावर मी छोटा माणूस आहे मला राज्यातले प्रश्न कळतात त्यासाठी मी सरकार बरोबर भांडतो आहे. शेट्टी सध्या शरद पवारांबरोबर आहेत. त्यांना देशव्यापी प्रश्न दिसतात त्यावर ते व्यक्त होत असतात. राज्यातल्या प्रश्नांमध्ये त्यांना फारसे पडायचे नसावे ते मोदी सरकारला प्रश्न करत आहेत त्याबद्दल आपले काही म्हणणे नाही, असे त्यांनी यावेळी सांगून शेट्टी यांच्याबाबत अधिकचे भाष्य करणे टाळले.
राज्यात एचटीबीटी बियाण्यांची लागवड करावी यासाठी आपली रयत क्रांती संघटना आग्रही आहे राज्य सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करून केंद्राला कळवले पाहिजे. या अभियानाचा लाभ शरद पवार आणि राजू शेट्टी दोघांनाही माहित आहे. त्यांच्या विचाराचे राज्यात सरकार आहे या बियाण्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच कापसाचे पडून राहणे शेतकऱ्याला परवडणारे नाही त्यामुळे त्यासाठी क्विंटल मागे दोन हजार रुपये आणि कडधान्यांच्या उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे 1 हजार रुपये राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी आपली आपली मागणी असल्याचे खोत यांनी सांगितले.