सध्या कलाकरांनी त्यांच्या सोशल मीडियापेजवर कोणता फोटो, व्हिडिओ किंवा एखादे डान्स चॅलेंज शूट, पोस्ट केलेय यापेक्षा चर्चा आहे ती कलाकारांनी आज कोणत्या नेटकरी ट्रोलरला दणका दिला याची. अभिनेता शशांक केतकर, अभिनेत्री हेमांगी कवी यांनी ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिल्याची चर्चा अजूनही विरली नसतानाच आता अभिनेत्री राजेश्वरी खरात म्हणजे फँड्रीगर्ल शालूनेही पोस्टवर चुकीच्या प्रवृत्तीने कमेंट करणाऱयाला शालूतून जोडे या म्हणीचा प्रत्यय दिला आहे. पहिल्याच सिनेमात एकही संवाद नसताना प्रेक्षकांना घायाळ करणाऱया राजेश्वरीने ट्रोलरला एकच दणका दिला आहे. राजेश्वरीच्या या सणसणीत रिप्लायने कलाकारांच्या पोस्टवर चुकीच्या प्रकारे रिऍक्ट होणाऱया नेटकऱयांना चांगलाच फटका बसला आहे. राजेश्वरीने तिचा एक फोटो इन्स्टापेजवर शेअर केला होता. या फोटोत राजेश्वरी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर एका नेटकऱयाने ‘आयुष्य फार छान आहे, फक्त तू बायको म्हणून घरी आली पाहिजेस’ अशी कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटमधील चुकीच्या प्रवृत्तीचा सूर राजेश्वरीला खटकल्याने रिप्लाय देत राजेश्वरीने असं लिहिलं आहे की… आयुष्य फार छान आहे… फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे हे ठिक आहे…!!! पण मग माझ्या आयुष्याचे काय… राजेश्वरीने फक्त एका वाक्यात त्या नेटकऱयाची नियत दाखवून दिली आणि त्याला गप्पं केलं. त्यानंतर राजेश्वरीच्या या हजरजबाबीपणाचे तिच्या चाहत्यांनी व मनोरंजन इंडस्ट्रीतील कलाकारांनी कौतुक केलं.
फँड्री या सिनेमानंतर दोन तीन वर्षाचा ब्रेक घेत राजेश्वरी आयटम गर्ल या सिनेमात दिसली तर एका नाटकातही तिने अभिनय केला. त्यानंतर मात्र ती रूपेरी पडदय़ापासून लांबच राहिली. अर्थात अभिनयापासून लांब गेल्यानंतर तिने शिक्षण पूर्ण केलं. सिनेमा, मालिकांमध्ये दिसत नसली तरी राजेश्वरी सोशलमिडियापेजवर सक्रिय असते. सणउत्सवाच्या दिवसात हमखास राजेश्वरी साडीतले फोटो शेअर करत असते. जेव्हा राजेश्वरीने फँड्री हा सिनेमा केला तेव्हा ती नववीत शिकत होती. पुण्यातील एका रस्त्यावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या कास्टिंगटीमने तिला पाहिलं. त्यानंतर तिच्या घरचा पत्ता शोधून काढला. आईवडीलांची परवानगी घेतल्यानंतर फँड्रीचा नायक जब्याची नायिका मिळाली. या सिनेमात राजेश्वरीने ज्या शालूची भूमिका केली होती तिला संपूर्ण सिनेमात एकही डायलॉग नव्हता. पण फक्त चेहरयावरचे हावभाव, डोळय़ातून व्यक्त होणे यावर राजेश्वरीने ही भूमिका करत प्रेक्षकांचे मन जिंकले. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि राजेश्वरीलाही त्याचा फायदा झाला. मात्र त्यानंतर पडदय़ावरची ही शालू मोठय़ा पडदय़ावर कमी आणि सोशलमिडियापेजवर जास्त दर्शन देऊ लागली. सोशलमिडियावर कलाकारांच्या फोटोवर काहीही कमेंट करणारयांवर राजेश्वरीने ओढलेला ताशेरा चर्चेत आला आहे.