प्रतिनिधी / कोल्हापूर
राजोपाध्येनगर परिसरातील निम्म्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होत आहे तर काही ठिकाणी पाणी पुरवठाच होत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर मध्यरात्री पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना रात्र जागूनच काढावी लागत आहे. एकीकडे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन व दुसरीकडे पाण्यासाठी पाणी पुरवठ्याचा लॉक डाऊन त्यामुळे येथील नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. प्रशासनाने या भागात पाणी गळती काढण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी परिसरात प्रचंड प्रमाणात खुदाई केली आहे.पण तरीही प्रशासनाला गळती काढण्यात अजूनही यश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न नागरिकांच्यातून व्यक्त केला जात आहे.
राजोपाध्येनगर परिसरातील बिडी कॉलनी, साईप्रसाद कॉलनी, डायना कॅसेस, राजेसंभाजी नगर, दत्त कॉम्प्लेक्स आदी भागांत काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी पुरवठाच होत नसल्यामुळे या भागात नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.दरम्यान पाईपलाईन ची गळती काढण्याचे काम गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे . यासाठी परिसतात चार ते पाच ठिकाणी प्रचंड प्रमाणात खुदाई केलेली आहे. पण अजूनही गळतीचे ठिकाण सापडलेले नाही. हे काम सुरू असताना एका ठिकाणी पाईपलाईन मध्ये चक्क दगड आढळून आले. कर्मचाऱ्यांनी दगड काढून पाईपलाईन स्वच्छ करूनही कमी दाबानेच पाणीपुरवठा होत आहे.
राजोपाध्येनगर ते साईप्रसाद कॉलनी, डायना कॅसेस, दत्त कॉम्प्लेक्स तसेच बिडी कॉलनी या भागात जाणाऱ्या मुख्य पाईपलाईन ला बऱ्याच ठिकाणी गळती लागलेली आहे. त्यावेळी मनपा प्रशासनाला वारंवार कळवूनही याची दखल न घेतल्यामुळे गळतीचे प्रमाण वाढत गेले आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. गळती काढण्यासाठी पाच ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोठी खुदाई करण्यात आली आहे, गेले आठ ते दहा दिवस प्रशासनाकडून गळती काढण्याचे काम सुरू आहे. पण अजूनही मुख्य कारण सापडले नसल्यामुळे नागरिकांच्यातून खंत व्यक्त केली जात आहे. पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार असा प्रश्न नागरिकांच्यातून उपस्थित केला जात आहे.
गळती न काढताच रस्त्याचे डांबरीकरण
काही दिवसांपूर्वी बिडी कॉलनीमध्ये मुख्य पाईपलाईन ला गळती असूनही त्यावरच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यावेळी येथील नागरिकांनी रास्ता रोको करून रस्त्याचे काम बंद पाडले होते. तसेच ठेकेदार व नागरिकांच्यात वादावादी झाली होती. यावेळी येथील लोकप्रतिनिधी ने गळती काढूनच रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल असे आश्वासन दिले होते पण तरीही काही दिवसांनी गळती न काढताच रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण केले. आता नव्याने केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरनावरब काही दिवसातच खुदाई करावी लागणार असल्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नमुना येथील नागरिकांना पहावयास मिळाला.