राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
घटनेच्या निर्मात्यांनी राज्यपालांची भूमिका जनता आणि सरकारसाठी ‘मित्र, द्रष्टा आणि मार्गदर्शका’च्या स्वरुपात असावी अशी कल्पना केली होती असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी केले आहे. राज्यपालांनी स्वतःच्या राज्यांमध्ये अधिकाधिक वेळ देण्यासह जनतेसोबत संबंध प्रस्थापित करण्याची सूचना राष्ट्रपतींनी राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या एक दिवसीय संमेलनाला संबोधित करताना केली आहे.
राज्यातील लोकांचे कल्याण आणि सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध आहात हे आठवणीत ठेवा. जनतेमधील जागरुकता वाढविणे आणि राष्ट्रीय उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी लोकांची भागीदारी सुनिश्चित करण्यात राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे उद्गार कोविंद यांनी काढले आहेत. या संमेलनात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भाग घेतला आहे.
लोकशाहीत आम्हा सर्वांनी सर्वसामान्य जनतेसोबत ‘निरंतर संपर्क’ ठेवायला हवा. सर्व राज्यपाल आणि उपराज्यपालांनी काही कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्हय़ांच्या ग्रामीण क्षेत्रांचा दौरा केलेला असेल असा मला विश्वास असल्याचे कोविंद यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या विरोधातील देशाच्या लढाईचे कौतुक करत राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या भूमिकेला अधोरेखित केले आहे. राज्यपालांनी कोरोना महामारी रोखण्यास सक्रीय योगदान दिले आहे. कोरोना विरोधात जगातील सर्वात व्यापक आणि प्रभावी मोहीम भारतात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. सर्व कोरोनायोद्धय़ांनी असाधारण बलिदान आणि दृढ संकल्पासह स्वतःच्या कर्तव्यांची पूर्तता केली आहे. सरकारचा अभूतपूर्व पुढाकार आणि आमचे वैज्ञानिक तसेच उद्योजकांच्या प्रयत्नांमधून देशात लसीचा विकास आणि मोठय़ा प्रमाणावर उत्पादन शक्य झाले आहे. लसीचे 108 कोटी डोस देऊन आम्ही देशवासीयांना महामारीपासून वाचविण्याच्या मोहिमेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपती भवनात राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या 51 व्या संमेलनाचे अध्यक्षत्व त्यांनी सांभाळले आहे. राज्यपालांचे संमेलन ही एक जुनी परंपरा आहे. राज्यपालांचे पहिले संमेलन 1949 मध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले होते.