राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप
प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात गुन्हेगारी कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांच्या मनात भयाचे वातावरण आहे. राज्यात आज प्रत्येक दिवशी बलात्कार, अपहरण, गँगवॉरच्या घटना होत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्याला ‘गुन्हेगारांचे स्थळ’ बनविले आहे. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्रीr राजीनामा देत नसतील तर राज्यपालांनी सरकार त्वरित बरखास्त करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष ज्यो डायस उपस्थित होते.
कळंगूट येथे 12 ऑगस्ट रोजी मृतावस्थेत सापडलेल्या सिद्धी नाईक हिच्या मृत्यूचे कारण शोधण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. शुक्रवारी सासष्टीत एका वडिलानेच आपल्या सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उजेडात आली. फोंडा येथे एका युवतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. या घटनांवरुन गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे उघड आहे. आज गुन्हेगांराना गोवा हे सुरक्षित स्थळ वाटत आहे.
भाजप सरकारने गोव्यातील गुन्हेगारी कारवायांना आळाबंद आणण्यासाठी काहीच केलेले नाही. भाजपने ड्रग माफिया, गुन्हेगार माफिया व भिकारी माफियांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळेच शांतताप्रेमी गोव्याचे नाव बदनाम झाल्याचे श्री. कामत म्हणाले.
दिगंबर कामत यांनी 21 जून 2020 रोजी झालेल्या सांताक्रूझ गँगवॉरपासून कालच समाजमाध्यमांवर झळकलेल्या पोलीस कॉन्स्टेबलकडून आपल्या बायकोला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा पाढाच वाचला. मागील तीन महिन्यांत गोव्यात गुन्हेगारी कारवायांत प्रचंड वाढ झाल्याचे दिगंबर कामत म्हणाले. कळंगूट येथे सापडलेल्या सिद्धी नाईक हिचा मृतदेह व सदर प्रकरणाचा गुंता सोडविण्यास पोलिसांना आलेले अपयश यावरही दिगंबर कामत यांनी टीका केली.
बाणावली येथे दोन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पालकांना दोष दिला होता. आता उत्तर गोव्यात झालेले संशयास्पद मृत्यू, बलात्कार घटना, अपहरणाचे प्रयत्न यावरुन मुख्यमंत्री कोणाला दोष देतील, असा प्रश्न दिगंबर कामत यांनी उपस्थित केला आहे.