प्रतिनिधी/ सांगे
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी शनिवारी सांगे मतदारसंघाचा दौरा केला. प्रथम जांबावली येथील प्रसिद्ध तसेच जागृत दैवत श्री दामोदराचे त्यांनी दर्शन घेतले. गोवा राज्य केरळसारखेच सुंदर आहे. गोव्यातील गावे शहरांपेक्षाही सुंदर आहेत. त्या गावांचा विकास करण्यास आपण कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पिल्ले यांनी उगे पंचायतीच्या सभागृहात बोलताना केले.
ऐतिहासिक जांबावली येथील मंदिराला भेट दिल्यावर राज्यपाल भारावून गेले. गावांना भेटी देऊन लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्यास सुरुवात केली असून गेले एक महिना निवडणुका असल्याने हे कार्य बंद होते. आता पुन्हा गावांना भेटी देणे सुरू केल्याचे राज्यपालांनी सांगितले. या दौऱयात त्यांनी उगे, भाटी आणि वाडे पंचायतीच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी उगेचे सरपंच उदय देसाई, वाडेचे सरपंच दामासियो बार्रेटो, भाटीचे सरपंच उदय नाईक, पंच माया जांगळी, भारती नाईक, संजय परवार, मार्पुस पेरेरा, दिव्या नाईक, अर्जुन नाईक, मनोज पर्येकर, रूपेश गावकर व इतर पंच उपस्थित होते
स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ऐकल्या समस्या
बफर झोन व राखीव जंगलामुळे भाटी गावातील घरे नियमित करणे कठीण होत आहे. या पंचायत क्षेत्रामधील पुर्नवसन केलेल्या धरणग्रस्तांना भूखंडांचा मालकी हक्क देण्यात आलेला नाही. तो त्यांना मिळवून द्यावा, अशी मागणी भाटीचे सरपंच नाईक यांनी राज्यपालांकडे केली. उगे पंचायतीच्या पंच जांगळी म्हणाल्या की, उगे पंचायत क्षेत्रातील खाण व्यवसाय बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या खाणी पूर्ववत सुरू कराव्यात. तर जनावरांमुळे उगे भागातील शेतजमिनी पडीक पडल्या आहेत. या शेतजमिनींना वीजतारांचे कुंपण घालावे, अशी मागणी उगेचे सरपंच देसाई यांनी राज्यपालांकडे केली.
वाडेचे सरपंच बार्रेटो म्हणाले की, साळावली धरणासाठी कुर्डीवासियांनी घरादाराचा त्याग केला. पण त्याच कुर्डीवासियांना आज पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. पर्येकर यांनी राज्यपालांना निवेदन सादर करून धरण बांधताना चुकून राहिलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली.