राजभवनवर सोहळा : अनेक मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी / पणजी
दोनापावला येथील काबो राजभवनवर झालेल्या शानदार सोहळ्यात पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून पदाची शपथ घेतली. यापूर्वी ऑगस्ट 2020 पासून गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे होता. आता पिल्लई यांच्या नियुक्तीमुळे गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल प्राप्त झाला आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजता झालेल्या या सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांनी पिल्लई यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी राष्ट्रपतींनी दिलेले पिल्लई यांच्या नियुक्तीचे पत्र वाचून दाखवले. त्यानंतर राज्यपालांनी पोलिसांकडून सलामी स्वीकारली.
त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती राजेश पाटणेकर, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, विज्ञान तंत्रज्ञानमंत्री मायकल लोबो, साबांखामंत्री दीपक पाऊसकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार अलिना साल्ढाना, सुभाष शिरोडकर, प्रविण झांटय़े, जोशुआ डिसोझा, ग्लेन टिकलो, नीळकंठ हळर्णकर, दयानंद सोपटे, लुईझिन फालेरो, महापौर रोहित मोन्सेरात आदी मान्यवर व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
गोवा हे देशातील सर्वांगसुंदर राज्य ः पिल्लई
दरम्यान, या सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यपाल पिल्लई यांनी गोवा हे देशातील सर्वांगसुंदर राज्य असल्याचे प्रशंसोद्गार काढले. सर्वांसाठी आदर्श अशी येथील सामाजिक एकात्मता, राज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही पिल्लई यांनी केले.
आता कामांना गती मिळेल ः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नवीन राज्यपालांचे स्वागत केले. तसेच नंतर पत्रकारांशी बोलताना, राज्याला पूर्णवेळ राज्यपाल मिळाल्याने कामांना गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यहिताच्या दृष्टीने महत्वाच्या विविध मुद्यांवर सरकारला राज्यपालांचे मार्गदर्शन मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
परिस्थिती बिकट, खर्च अफाट!
केवळ तीन मिनिटांच्या या छोटेखानी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला दिमाखदार वॉटरप्रूफ शामियाना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्याचे दिसून येत होते. त्यासाठी किमान 20 लाख खर्च करण्यात आले असावे, असे अंदाजही काहीजण बांधत होते. मोठय़ा प्रमाणात पॉश सोफावजा खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. पोलिसांची प्रचंड उपस्थिती होती. परंतु ते बसू शकत नसल्यामुळे शेवटपर्यंत बहुतेक सोफा रिक्तच राहिले. मंत्री, आमदार आणि अन्य प्रतिष्ठितांसाठी राखीव सोफांवरही जेमतेम उपस्थिती दिसत होती. वादळी वाऱयासह जोरदार कोसळणाऱया पावसामुळे अनेक निमंत्रितांनी सोहळ्यास न येणे पसंत केले असावे, असे वाटत होते. तरीही राज्यपालांसोबत मोठय़ा प्रमाणात आलेल्या पाहुण्यांमुळे त्यातील बऱयाच सोफांची शान वाढली होती. अन्यथा संपूर्ण शामियाना रिक्तच भासला असता, असेच चित्र होते.
राजभवनचा परिसर विस्तीर्ण, मनभावक असला तरीही यापूर्वी झालेले कित्येक राज्यपाल तसेच मंत्र्यांचे शपथविधी सोहळे राजभवनच्या दरबार हॉलमध्येच आयोजित करण्यात आले होते, याचीही आठवण यावेळी काहीजणांनी करून दिली. राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना हा एवढा खर्च अनाठायी होता, असे आता सर्वत्र चर्चिले जात आहे.