काँग्रेस पक्षाकडून सहकाऱयांचा शोध सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पक्षांतर्गत कलहाला तोंड देणाऱया काँग्रेसने आता विरोधकांमधील एकजुटता दाखवून देण्याचा निर्धार केला आहे. राज्यसभा उपसभापती पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात 14 सप्टेंबर रोजी होणार असून त्याचदिवशी ही निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 11 सप्टेंबर आहे.
रणनीति निश्चित करण्यासाठी मंगळवारी झालेल्या काँग्रेसच्या एका बैठकीत निवडणुकीसाठी संपुआच्या घटक पक्षांसोबत उर्वरित पक्षांशी संपर्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपसभापती राहिलेले संजद खासदार हरिवंश नारायण सिंग यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवडणूक होणार आहे. परंतु त्यांची राज्यसभेवर पुन्हा निवड झाली आहे.
हरिवंश यांच्याशी लढत?
हरिवंश सिंग राज्यसभेवर पुन्हा निवडून आल्याने रालोआकडून त्यांनाच संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. 2018 मध्ये काँग्रेसच्या पी.जे. कुरियन यांच्यानंतर हरिवंश हे उपसभापती झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार बी.के. हरिप्रसाद यांना 20 मतांनी पराभूत केले होते.
पत्र लिहिणारे नेते बैठकीत
पत्र लिहून पक्षात मोठय़ा सुधारणा करण्याची मागणी करणारे तीन नेतेही बैठकीत सामील होते. या पत्रावरून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला असून अद्यापही तणाव आहे. मंगळवारच्या बैठकीत पत्र लिहिणाऱयांपैकी गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मनीष तिवारी सामील झाले आहेत.
चर्चेनंतर ठरणार उमेदवार
काँग्रेसच्या रणनीतिक समुहाच्या डिजिटल बैठकीत अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह माजी अध्यक्ष राहुल गांधी, दोन्ही सभागृहांमधील पक्षाचे नेते आणि काही अन्य वरिष्ठ नेतेही सामील झाले आहेत. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पेटला असताना ही बैठक झाली आहे. राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड अन्य पक्षांशी चर्चा केल्यावर करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.