ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर होत असलेल्या राज्यसभा पोटनिवणुकीसंदर्भात भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपकडून देण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे आज आपला अर्ज मागे घेत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 23 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून दाखल करण्यात आलेला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आता काँग्रेसची विनंती भाजपने मान्य केली. भाजपनेही काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. दुपारी 1 वाजात ते आपला उमेदवारी माघारी घेणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर होती. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.