महाराष्ट्र-तामिळनाडूत अनेक दावेदार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राज्यसभेच्या 7 जागांकरता निवडणुकीची घोषणा झाली असून 4 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूच्या दोन जागा, पुड्डुचेरी, आसाम, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या 7 पैकी 2 जागा काँग्रेसला मिळू शकतात. याचमुळे पक्षाच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस दोन जागा लढविण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील एका जागेवर पक्ष उमेदवार उभा करू शकतो. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान जागावाटप सूत्रामध्ये द्रमुकने एक जागा काँग्रेसला देण्याचे आश्वासन दिले होते. तर दुसरी जागा महाराष्ट्रातील असून राजीव सातव यांच्या निधनामुळे ती रिक्त झाली आहे.
काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्यासाठी गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यापासून प्रमोद तिवारी आणि काँग्रेस डाटा ऍनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती समवेत अनेक दिग्गज नेते प्रयत्न करत आहेत. तामिळनाडू निवडणुकीदरम्यान द्रमुकसोबत जागावाटपाची चर्चा करण्यासाठी गुलाम नबी आझाद गेले होते, या चर्चेत त्यांनी राज्यसभेची एक जागा काँग्रेसला देण्याचे आश्वासन मिळविले होते.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक पाहता प्रमोद तिवारी यांनीही राज्यसभेसाठी दावेदारी सुरू केली आहे. तिवारी हे प्रियंका वड्रा यांचे निकटवर्तीय आहेत. महाराष्ट्रातील जागेसाठी काँग्रेसचे 3 दावेदार आहेत. मुकुल वासनिक यांनी याबाबतचा निर्णय पक्षनेतृत्वावर सोपविला आहे. तर राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा हे देखील प्रमुख दावेदारांपैकी एक आहेत. याचबरोबर संजय निरुपम देखील प्रयत्नात आहेत. अलिकडेच त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.