नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात बाराहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेत खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी सरकारवर केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांनी विजय चौक येथे आल्यानंतर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही पेगॅससचा मुद्दा, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती. आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथे यावं लागले कारण आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे.काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्यसभेत शेवटच्या दिवशी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता, असे वाटत होते की आपण पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत. सरकार दररोज लोकशाहीची हत्या करत आहे, अशी टीका राऊत यांनी केली. आम्ही या सरकारविरोधात लढा देत राहू, असं राऊत म्हणाले.