दिग्विजय सिंगांची ज्योतिरादित्य सिंधियांवर उपरोधिक टिप्पणी -सभागृहात हास्यकल्लोळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यानंतर त्वरित दिग्विजय सिंग यांचे नाव चर्चेत भाग घेण्यासाठी पुकारण्यात आल्याने गुरुवारी राज्यसभेत हास्यकल्लोळ झाला आहे. हास्यलाटेदरम्यान सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी यादीनुसारच नाव पुकारल्याची मिश्किल टिप्पणी केली असता दिग्विजय सिंग यांनाही हसू आवरले नाही. सिंधिया यांचे अभिनंदन करू इच्छितो, जितक्या चांगल्याप्रकारे ते संपुआ सरकारची बाजू मांडायचे, तितक्याच कुशलतेने त्यांनी रालोआ सरकारची बाजू मांडली आहे, वाह जी महाराज वाह, अशी उपहासात्मक टिप्पणी दिग्विजय सिंग यांनी केली आहे.
हे ऐकल्यावर ज्योतिरादित्य यांनाही हसू आले. त्यांनी दिग्विजय यांना ‘तुमच्या आशीर्वादा’मुळेच असे मिश्किल प्रत्युत्तर दिले आहे. यावर दिग्विजय यांनीही ‘आशीर्वाद कायम राहिल, कुठल्याही पक्षात रहा, आमचा आशीर्वाद असेल’ असे सिंधिया यांना उद्देशून म्हटले आहे.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणि शेतकऱयांच्या मुद्दय़ावर सलग दुसऱया दिवशी चर्चा झाली आहे. चर्चेत दिग्विजय यांचा क्रमांक येण्यापूर्वी ज्योतिरादित्य यांनी अटलबिहारी वाजपेयींनी पाहिलेले स्वप्न मोदी सरकारने पूर्ण करून दाखविल्याचे विधान केले होते. जम्मू-काश्मीरमधून 370 हटविल्यावर तेथील दहशतवाद संपला का, अशी खोचक टिप्पणी दिग्विजय यांनी केली आहे. शेतकऱयांशी चर्चा करण्यासाठी सरकारने कृषिमंत्र्याला पुढे केले, तसेच पियूष गोयलांना सामील केले, पण गोयलांचे शेतकऱयांशी कुठले देणेघेणे होते, असे म्हणत दिग्विज यांनी राजनाथ सिंग यांना ही जबाबदारी देणे योग्य ठरले असते असे उद्गार काढले आहेत.
कोरोनाचा बाउन्सर सीमेपार
कोरोना एक अदृश्य शत्रू होता. जगात कोटय़वधी लोक बाधित झाले, 20 लाख जीव गेले, पण भारताने कोरोनाच्या बाउन्सरला शॉट मारून सीमेपार टोलावले आहे. सध्या जागतिक रिव्हकरी रेट 70 टक्के आहे. भारतात हा सर्वाधिक 97 टक्के आहे. कोरोनाची दुसरी लाट भारताला स्पर्शही करू शकलेली नाही. भारतातील नेतृत्वाने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यानेच हे शक्य झाल्याचे उद्गार सिंधिया यांनी काढले आहेत.
हिंसेस शेतकरी जबाबदार नाही
प्रजासत्ताक दिनी जे घडले, त्याची आम्ही निंदा करतो, पण यासाठी शेतकरी जबाबदार नाही. त्यांना याची शिक्षा दिली जाऊ नये. काही समाजकंटकांनी तेथे हिंसाचार केला. कृषी हा राज्याचा विषय असल्याने यावर राज्य सरकारचेही मत विचारात घेतले जावे. सरकारला हा मुद्दा शांततेने सोडवाव लागणार असल्याची भूमिका माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी मांडली आहे.