प्रचंड धक्काबुक्की-मारामारी, जनतेची क्षमा मागण्याची भाजपची मागणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संपूर्ण पावसाळी अधिवेशनात कामकाज होऊ द्यायचे नाही, असा चंग बांधलेल्या विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी गुरुवारी राज्यसभेत कहर केला आहे. सुरक्षेसाठी आणलेल्या महिला मार्शलवरच त्यांनी हल्ला करून त्यांच्याशी धक्काबुक्की आणि मारामारी केल्याचे दिसून येत आहे. असा प्रकार राज्यसभेच्या इतिहासात प्रथमच घडल्याचीही चर्चा आहे. विरोधी पक्षांनी राजकीय सभ्यतेचा तळ गाठला असून राज्यसभेत केलेल्या प्रकारासाठी जनतेची क्षमा मागावी अशी मागणी भाजपने केली.
राज्यसभेतील या उद्वेगजनक प्रकारचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावरून प्रसिद्ध होत आहे. या फूटेजमध्ये विरोधी पक्षांच्या महिला सदस्या महिला मार्शलला ओढत असल्याचे दिसत आहे. धक्काबुक्की आणि मारामारी होताना दिसत असून सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य यात सहभागी आहेत, असे स्पष्ट दिसते.
विरोधकांचा कांगावा
संसद अधिवेशनाच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी केवळ राज्यसभेत कामकाज करण्याचा प्रयत्न करण्यग्नात आला. मात्र, सरकार चर्चेविनाच विधेयके संमत करुन घेत असून पेगॅसस आणि कृषी कायद्यांसंबंधी चर्चा करण्यास नकार देत आहे, असा आरोप करत विरोधी सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. तथापि, सरकार प्रत्येक विधेयकावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असताना विरोधी पक्षांनीच सभागृहांमध्ये शांतता न राखल्याने चर्चा होऊ शकली नाही. मात्र तेच विरोधी पक्ष आता सरकारच चर्चेला तयार नसल्याचा कांगावा करीत आहेत, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही विरोधकांना दूषणे मिळत आहेत.
केंद्रीय मंत्र्यांचा आरोप
राज्यसभेचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसेच अनुराग ठाकूर यांनी संसदेचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. विरोधकांनी सारेच ताळतंत्र सोडले असून राज्यसभेत त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीसाठी जनतेची क्षमा मागावी. जनता असे प्रकार सहन करणार नाही. विरोधकांना याची किंमत चुकवावी लागेल, अशी टीका त्यांनी केली. राज्यसभेतील प्रकार साऱया भारताने पाहिलेला आहे. भारताची प्रतिमा विरोधकांनी मलीन केली आहे, असा आरोप त्यांनी केला. संसदेत आपल्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी असे सर्वसामान्यांना वाटते. पण विरोधकांना जनतेच्या भावनांशी काहीही देणेघेणे नाही. काल्पनिक मुद्दय़ांवर ते कामकाज बंद पाडण्यग्नातच स्वारस्य दाखवितात, अशी टीका ठाकूर यांनी केली.
विरोधकांचा दावा
केंद्र सरकारने राज्यसभेत महिला मार्शल आणून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यसभेतील धक्काबुक्कीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि इतर विरोधी नेत्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना निवेदन देऊन राज्यसभेतील प्रकार कथन केला.
दोन दिवस आधीच समाप्ती
लोकसभेचे कामकाज बुधवारीच संस्थगित करण्यात आले होते. राज्यसभेतील अभूतपूर्व गोंधळामुळे राज्यसभाही संस्थगित करण्यात आली. हे पावसाळी अधिवेशन दोन दिवस आधीच संपविण्यात आले आहे. या अधिवेशनात 13 विधेयके संमत करण्यात आली असली तरी कामकाज दोन्ही सभागृहांमध्ये मिळून 50 तासही होऊ शकले नाही. यामुळे प्रचंड पैसा वाया गेला आहे.
आरोप-प्रत्यारोप…
सत्ताधारी
- दोन दिवसांपूर्वी विरोधी सदस्य अध्यक्षंच्या टेबलवर उभे होते. इतके हीन राजकारण यापूर्वी कधी झाले नव्हते. ही अधोगतीची परिसीमा आहे.
- विरोधी सदस्यांनी मार्शलबरोबरच धक्काबुक्की केली. हा असभ्यतेचा कळस होता. त्यांनी आपल्या वर्तनासाठी जनतेची क्षमा मागितली पाहिजे
- विरोधकांनी ताळतंत्र सोडले आहे. प्रत्येक विषयावर चर्चेस तयार असताना त्यांनी कामकाज होऊ दिले नाही. आता कांगावा करीत आहेत.
विरोधक
- महिला मार्शल आणून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मार्शलनी विरोधी सदस्यांना मारहाण केली. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला.
- राज्यसभेत सरकारने अनेक विधेयके चर्चेविना संमत केली. हा लोकशाहीचा अवमान आहे. पेगॅसस व कृषी कायद्यांची चर्चा टाळली गेली.
- खासदारांना नियंत्रणात आणण्यासाठी 30 ते 40 मार्शल बोलाविण्यात आले. असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. हे अयोग्य आहे.