आज उमेदवारी अर्ज दाखल करणार : आणखी एका जागेसाठी अशोक गस्ती यांना संधी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कुतूहल निर्माण झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार निश्चित केले आहेत. भाजपमध्ये कोणाला तिकीट मिळणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना भाजप हायकमांडने दोन जागांसाठी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट जाहीर केले आहे. बेळगाव जिल्हय़ातील नेते ईरण्णा कडाडी आणि अशोक गस्ती यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य विधानसभेवरून राज्यसभेच्या चार जागांसाठी 19 जून रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दि. 9 जून ही शेवटची तारीख आहे. विधानसभेतील सदस्य संख्याबळानुसार चार जागांपैकी दोन भाजपला आणि काँग्रेस व निजदला प्रत्येकी एक जागा मिळण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबत राज्य भाजपने शनिवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेतली होती. या बैठकीत प्रभाकर कोरे, रमेश कत्ती, प्रकाश शेट्टी, निर्मलकुमार सुराणा, प्रा. नागराजू यांच्या नावांची शिफारस हायकमांडकडे केली होती. परंतु, हायकमांडने राज्य भाजपची शिफारस फेटाळत पक्षबांधणीसाठी कार्य करणाऱया ईरणा कडाडी आणि अशोक गस्ती यांना तिकीट जाहीर केले आहे. मंगळवारी या दोघांचे अर्ज निवडणूक अधिकारी तथा विधानसभेच्या सचिवांकडे दाखल करण्यात येतील.
ईरण्णा कडाडी प्रभावी लिंगायत नेते
ईरण्णा कडाडी हे प्रभावी लिंगायत नेते आहेत. ते बेळगाव जिल्हय़ाच्या मुडलगी तालुक्यातील कल्लळी गावचे आहेत. 1980 पासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. अरभावी विधानसभा मतदारसंघातील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. गोकाक तालुका भाजप अध्यक्ष, बेळगाव जिल्हा भाजप सचिव तसेच बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्षपदाची धुरा त्यांनी दोनवेळा सांभाळली आहे. त्याचप्रमाणे राज्य भाजपच्या सचिवपदाची जबाबदारही पेलली आहे. 1994 मध्ये अरभावी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, माजी मंत्री व्ही. एस. कौजलगी यांच्याकडून ते पराभूत झाले. 2004 मध्ये बेळगाव ग्रामीण विभागाचे अध्यक्ष, 2010 मध्ये बेळगाव जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. सुरुवातीपासून रा. स्व. संघाशी जवळीक असणारे कडाडी सध्या बेळगाव, चिकोडी, बागलकोट, विजापूर, बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण या भागांचे पक्ष प्रभारी म्हणून काम करीत आहेत.
अशोक गस्ती
तसेच अशोक गस्ती हे सविता समाजातील नेते असून मूळचे रायचूर जिल्हय़ातील आहेत. ते बीए, एलएलबी पदवीधर आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. रायचूर जिल्हा भाजप अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. रायचूर जि. पं. अध्यक्ष, राज्य मागासवर्ग निगमचे अध्यक्षपदही भूषविले आहे. भाजपच्या मागासवर्ग मोर्चाच्या सचिवपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे.