मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्याला आत्मनिर्भर बनविण्याचा ध्येय ठेवून गावांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आदी सर्वच बाजूंनी विकास साधण्यासाठी गाव दत्तक योजना 2 ऑक्टोबरपासून सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 74व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलताना दिली.
राज्यातील 192 ग्रामपंचायत क्षेत्रात नागरी सेवा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. सरकारच्या विविध योजना व इतर सेवेचे अर्ज या नागरी सेवा केंद्रात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी गावांना भेटी देऊन नागरिकांना योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करतील. सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालय आणि जीआयपीएआरडी या खात्यांनी संयुक्तपणे राज्यातील 192 ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासंबंधी अहवाल तयार करून सरकारला सादर केला आहे. राज्याला आत्मनिर्भर बनविण्यासाठी या अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील इलेक्ट्रॉनिक सिटीच्या कामाला चालना दिली जाणार आहे. राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून शेती, पर्यटन व इतर क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ कृषी,डेअरी, मच्छीमारी बांधवांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोविड महामारीमुळे आर्थिक स्थितीवर परिणाम झालेला असला तरी अंत्योदय तत्त्वांवरील एकही योजना बंद करण्यात आली नाही. आर्थिक स्थितीमुळे मानधन वितरणाला थोडा उशीर होत आहे. राज्यात 150 मॅगावेट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सौर ऊर्जा निर्मिर्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना अनुदान दिले जात आहे. या अनुदानतंर्गत 53 लाख रूपयांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.