प्रतिनिधी/ मडगाव
राज्यात होणाऱया रेल्वे दुपरीकरण, पॉवर ट्रान्समिसशन व रस्ता चौपदरीकरण सारखे प्रकल्प त्वरित रद्द झाले पाहिजे. कारण अशा प्रकल्पामुळे वृक्षतोड झाल्यास जैवविविधतेला धोका निर्माण होईल. जरी हा प्रकल्प केंद्र सरकारचा असला तरी राज्य सरकारची परवानगी केंद्र सरकारला घ्यावीच लागते. त्यामूळे गोव्यातील जनतेने एकत्र येऊन हे प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केले आहे.
मडगाव येथे दक्षिण गोवा काँग्रेसच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष ज्यो डायस उपस्थित होते.
राज्यात येणारे हे प्रकल्प लोकांसाठी नसून ते कॉर्पोरेटच्या हितासाठी आहेत. कोळशामुळे वास्कोत खुपच प्रदूषण झालेले आहे. एमपीटी पैशांसाठी काहीही करायला तयार आहे. तसेच एमपीटी गोव्याच्या हितासाठी नाही. राज्यातील जैवसंपदा नष्ट झालेले आम्हाला नको आहे. राज्याच्या हितासाठी लढणाऱया प्रत्येक संस्थेला पाठेंबा आपण दिला पाहिजे. ‘गोंयचो एकवट’ ही संस्था स्वताच्या फायद्यासाठी नसून तर राज्यातील हितासाठी लढत आहे. या संस्थेला आपण पाठिंबा देण्याचा प्रयत्न करावा असे खा. सार्दीन म्हणाले.
गोव्यात बेरोजगारी असून देखील ‘पोस्टमन’ आता इतर राज्यातून गोव्यात आणले जातात. हे बंद होण्याची गरज आहे. पोस्टमन म्हणून काम करणारे गोव्यातील युवक अजून पर्यंत कंत्राट पद्धतीवर काम करत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पोस्ट मास्टर जनरल गोव्यात नसून तर ते महाराष्ट्रात असतात. कोंकण रेल्वेत सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे. त्यामूळे गोव्यात परप्रांतीय लोकांना नोकरी देण्यापेक्षा त्याजागी गोव्यातील युवकांनाच नोकरी मिळेल अशा प्रकारचे पाऊल सरकारने घ्यावे.
जे नागरिक राज्यातील समस्या सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारवाई न करता त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. जे प्रकल्प लोकांना हवे तेच प्रकल्प गोव्यात आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावे असे खा. सार्दीन यांनी पुढे बोलताना सांगितले.