मुख्यमंत्रीने राजीनामा द्यावा, आम आदमी पक्षाची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे. सावंत, यांच्याकडे गृहमंत्री पदाचाही ताबा आहे, ते राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी तातडीने आपला राजीनामा द्यायला हवा, असे आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख राहुल म्हांबरे यांनी पत्रकार परीषदेत केला.
गोव्यासारख्या लहानश्या राज्यात कायदा सुव्यस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. ड्रग व्यवहार, रेव्ह पाटर्य़ा, बेटिंग आणि दिवसाढवळय़ा होणारे खून यासारखे प्रकार रोजचेच होत असल्याने ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्याने अतिशय भयंकर व गंभीर गुह्यांची मालिका अनुभवलेली आहे. जवळपास दीड महिन्यापूर्वी मडगावमध्ये एका सराफी दुकानमालकाचा भर दिवसा सुरा खुपसून खून करण्यात आला. शिरदोन समुद्रकिनाऱयावर एका दोन वर्षांच्या कोवळय़ा बालिकेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत, 20 दिवसांपूर्वी सापडला. पोलीस कर्मचारी या प्रकरणातले गूढ सोडविण्यात अपयशी व लाचार झालेले पाहायला मिळाले. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी हत्या वा खून, म्हणून हे प्रकरण नोंद करण्यापेक्षा केवळ एक मृतदेह सापडला एवढाच उल्लेख करून प्रकरण नोंद केलेले आहे. पोलीस व्यवस्था आणि अधिकारी या प्रकरणांचा तपास करण्यात किती प्रमाणात आळशीपणा आणि हलगर्जीपणा करतात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. असे म्हांबरे यांनी पुढे सांगितले.
पर्वरी येथे असलेल्या तोर्डा गावाजवळ एका व्यक्तीला 2 दिवसांपूर्वी जिवंत जाळून मारण्यात आले आणि पोलिसांना या प्रकरणाची जलद चौकशी करून गुन्हेगारांना अटक करणे जमलेले नाही. यावरून असे दिसून येते अशा प्रकारच्या गुह्यांमध्ये वाढ होत असून कायदा व्यवस्था ढासळली असताना हे प्रकार वाढत आहेत. पोलीस प्रशासनाने रात्री तसेच दिवसाही गस्त वाढवून गोव्यातील लोकांमध्ये पोलीस व्यवस्थेबदल विश्वास पुन्हा मजबूत करायला हवा. असेही म्हांबरे यांनी सांगितले.