मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : पाळी-कोठंबी पंचायत कार्यालयाची पायाभरणी
प्रतिनिधी /सांखळी
राज्यातील खनिज व्यवहार येत्या आठ महिन्यांत सुरू होणार असून याविषयी केंद्र आणि राज्य सरकारने राज्याच्या हिताचा आणि स्थनिक खाण अवलंबित लोकांचा विचार करूनच हे पाऊल उचलले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. काल बुधवारी पाळी-कोठंबी पंचायतीसाठी उभारण्यात येणाऱया नव्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की आपल्या मतदारसंघातील सर्व लोकांची काळजी आपल्यास आहे. कसलीच ठोस माहिती उपलब्ध नसताना विरोधाला विरोध म्हणून बोलणाऱयांपासून लोकांनी सावध राहावे. आपले सरकार हे प्रत्येक व्यक्तीचे आहे. आम्ही विरोधकांतही कधीही फरक मानलेला नाही. गोव्याच्या आणि आपल्या गावच्या विकासात साथ देणारे सर्व आपले आहे. आपल्या सरकारने सर्वांना समान योजना आखली असून आता निवडणुकीच्या काळात येऊन कोणी येऊन काहीतरी फसवेगीरी सांगत असेल तर, तुम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना उत्तर देण्याची गरज आहे.
पाळी गावचा विकास झाला, हे आपण सांगण्याची गरज नाही, तो समोर दिसत आहे. मात्र माझ्या गावात पंचायत कार्यालयासाठी नूतन सुसज्ज इमारत व्हावी, हे आपले स्वप्न आणि समस्त पाळीवासियांची मागणी पूर्ण होताना आपणास अत्यानंद होत आहे, हे सगळं तुमच्यामुळे शक्मय झाले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तळेमाथा येथे भूमिपूजन करून या प्रकल्पाची मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पायाभरणी केली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सरपंच प्रशिला गावडे, उपसरपंच महेश गावस, पंच करिश्मा कामत, राधिका गावडे, लक्ष्मीकांत परब, संतोष नाईक, रोहिदास नाईक, हरिश हडकोणकर यांची उपस्थिती होती. या इमारतीवर सरकार दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च करणार असून सर्व साधनसुविधांनी युक्त अशी ही इमारत असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नाईक यांनी केले.