डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात निवडणूक होण्याची शक्यता : राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाने चालविला आहे. त्यानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीन आठवडय़ात वेळापत्रक निश्चित करण्याची सूचना न्यायालयाने यापूर्वीच निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
सदर निवडणूक दोन टप्प्यात घेण्याबाबत आयोग गंभीरपणे विचार करीत आहे. राज्य निवडणूक आयुक्त बसवराज यांनी ग्रामपंचायत निवडणूक घेण्याबाबत 17 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे. तसेच त्यांनी जिल्हय़ातील कोरोना परिस्थितीची माहिती जाणून घेतली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या जिल्हाधिकाऱयांनी दोन टप्प्यात निवडणूक घेणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱयांना पत्र लिहून ग्रामपंचायत निवडणुका दोन टप्प्यात घेण्याबाबत तुम्ही व्यक्त केलेल्या मतावर अधिक लक्ष दिले आहे. त्यामुळे आपल्या जिल्हय़ातील कोणकोणत्या तालुक्यात पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात निवडणुका घ्याव्यात, याबाबत आयोगाला पत्र पाठविण्याची सूचना केली आहे.
सर्व जिल्हाधिकाऱयांचे मत जाणून घेऊन निवडणूक आयोग ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख निश्चित करणार आहे. दोन टप्प्यात ही निवडणूक होणार असून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात निवडणूक होण्याची अधिक शक्यता आहे. न्यायालयाच्या सुचनेनुसार आयोग नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात निवडणूक तारीख ठरणार असल्याचे समजते.