ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील शाळा आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय शुक्रवारी ठाकरे सरकारने घेतला. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाटय़गृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वी 50 टक्क्यांच्या मर्यादेसह कोरोना नियमावलीचे पालन करुन 5 नोव्हेंबरपासून नाटय़गृह सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. त्यानंतर राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू आहे.