आ.प्रकाश आबीटकर
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील सहकारी पतसंस्थांना अडचणीच्या ठरणाऱया नियामक मंडळाच्या जाचक नियम व अटी लवकरच शिथिल होणार आहेत. पतसंस्थांच्या विविध प्रश्नाबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे. अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राज्यात 22 हजार हून अधिक पतसंस्था असून 2.50 कोटी सभासद ठेवीदार व कर्जदार यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम पध्दतीने काम करत आहेत. परंतु राज्य शासनाने 7 सप्टेंबर 2017 रोजी सहकारी अधिनियम 1960 मध्ये प्रकरण (अ) नुसार नियामक मंडळाची स्थापना केली. या माध्यमातून पतसंस्थांवर जाचक नियम व अटी लादण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आणत आमदार आबिटकर यांनी नियामक मंडळ बरखास्त करण्याची मागणी विधानसभेत केली होती.
अंशदान अनुदान रक्कम ठेवीवर न घेता होणाऱया नफ्यावर आकारणे, तसेच अंशदान रक्कम या ऐवजी स्थैर्य निधी या शब्दाचा वापर करावा, पतसंस्था, सेवा संस्था यांच्या निवडणुकीचा खर्च सभासद संस्थेवर आकरण्यात येता.s तो आकरण्यात येवू नये, निवडणूक बिनविरोध झाल्यास निवडणूक खर्च न घेणे, पतसंस्था कर्मचाऱयांना सेवा नियम लागू करणे, पतसंस्था कर्मचाऱयांना प्रशिक्षणे व शिबीरे भरविणे, अ' वर्ग सभासदांकडून ठेवी स्विकारण्याची अट शिथील करणे,
ब’ वर्ग सभासदांना कर्ज देण्यास परवानगी देणे, पतसंस्थांच्या माध्यमातून इतर सेवा पुरविण्यास मुभा देण्यात यावी. यासह विविध विषयांवर चर्चा होवून त्यास तत्वता: मंजूरी देण्यात आली आहे. तसेच नियामक मंडळाकडून काढण्यात आलेल्या सर्व आदेशाना स्थगिती देण्यात आली असून शासनस्तरावरून धोरणात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादले जाणार नसल्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगितले.
यावेळी बैठकीस सहकार आयुक्त अनिल कवडे, विभागीय सहनिबंधक कोल्हापूर श्रीकृष्ण वाडेकर, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर अरुण काकडे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासो कोयटे, उपनिबंधक (पतसंस्था) राम कुलकर्णी, पतसंस्था प्रतिनिधी शांताराम भिंगुर्डे, सुधाकर पिसे, शांताराम हाजगुळकर, अर्जुन कुंभार, राजेश लोळगे, सुरेश गुंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पतसंस्थांना अधिकाधिक सेवा सुविध देणे गरजेचे
राज्यातील खासगी सावकारी पासून वाचविण्यासाठी पतसंस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत. शासनाकडून पतसंस्थांना अधिकाधिक सेवा सुविध देणे गरजेचे आहे. या करिता पतसंस्थाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. – आमदार प्रकाश आबिटकर