मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लसीकरणावर देखील भर दिला जात आहे. तरी देखील राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी एक पत्रच थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.’ट्ववीट करत याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी ट्ववीट करत पत्राचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
बाळासाहेब थोरात यांनी पत्रात काय म्हटले आहे ?
कोरोनाच्या संकटकाळात आपण अत्यंत संयमाने महाराष्ट्राची काळजी घेत आहात. अनेक लोकोपयोगी निर्णय आपण घेतले आहेत. आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत आहे. एक विषय मात्र आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही धोका आहे.
या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे असे माझे मत आहे. तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यातील सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. तरी आपण या संदर्भाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी थोरात यांनी पत्राद्वारे केली आहे.