बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि अनेक जिल्ह्यांतील पुरामुळे राज्यभरातील अनेक रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. पीडब्ल्यूडी विभागाच्या कामांचा आढावा घेताना बोम्माई अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने ३०० कोटी रुपये जारी केले आहेत, असे ते म्हणाले.
या प्रकल्पांसाठी भूसंपादनासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) हाती घेतलेल्या १ हजार कोटी रुपयांच्या कामांवर ते जिल्हा अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, बोम्माई यांनी गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना विविध लाभार्थी योजनांमधील घरांची प्रलंबित बांधकामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत सुमारे १.८ लाख घरांशी संबंधित कामे प्रलंबित आहेत. बेंगळूरमध्ये मुख्यमंत्री बहुमजली गृह योजनेअंतर्गत ४२,३६१ घरे बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. याशिवाय, राज्य सरकारने घेतलेल्या विविध ग्रामीण गृहप्रकल्पांसाठी लाभार्थ्यांची ओळख पटवावी लागेल, त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कामे सुरू करण्याचे आवाहन केले.