मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : सरकारच्या द्विवर्षपूर्ती निमित्त कार्यक्रम
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील प्रत्येक नागरिकास स्वयंपूर्ण बनवतानाच राज्यालाही आत्मनिर्भर बनविण्याचे विद्यमान सरकारचे प्रयत्न असून सध्या विविध स्तरांवर काम चालू आहे. त्यासाठी सरकारातील प्रत्येक अधिकाऱयास कार्यरत करण्यात आले आहे. ग्राम पंचायतपातळीवर स्वयंपूर्ण मित्रांच्या माध्यमातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम चालू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
आता आम्हाला खऱया अर्थाने स्वयंपूर्णतेकडे जाण्याची गरज आहे. गोव्याच्या मुक्तीची 60 वर्षे साजरी करत असतानाच येत्या 19 डिसेंबरपर्यंत सरकारकडून ज्या ज्या गोष्टी करणे बाकी आहे, त्या पूर्ण करण्यात यश येईल, अशी अपेक्षा डॉ. सावंत यांनी व्यक्त केली. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून लवकरच उद्योगांकडून 37 हजारांहून अधिक नोकऱया निर्माण करण्यात येतील. त्याशिवाय तुये इलेक्ट्रॉनिक सिटी आणि मोपा येथील विमानतळ येत्या वर्षभरात पूर्ण करणार असे मुख्यमंत्री म्हणाले.
सावंत सरकारने दोन वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केल्याबद्दल पर्वरी विधानभवनातील परिषदगृहात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कोरोनासारख्या महासंकटाच्या काळातही कशाप्रकारे विविध आव्हानांचा सामना करत गोवा सांभाळण्याचे शिवधनुष्य पेलले तसेच मार्गी लावलेल्या विविध रोजगारक्षम योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
शैक्षणिक धोरण पुढे नेण्याचे काम सुरु
नवे शैक्षणिक धोरण पुढे नेण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू असून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व आमदार सुभाष शिरोडकर यांची समिती अभ्यास करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तिनशे कोटींच्या पॅकेजबद्दल केंद्राचे आभार
गोव्याच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त 300 कोटी रुपयांची खास आर्थिक पॅकेज दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. या आर्थिक निधीतून वेगवेगळी कामे हाती घेण्यात येतील. तसेच संपूर्ण निधीचा राज्याच्या हितासाठी कसा विनियोग करण्यात येईल, त्यावर अर्थसंकल्पात सविस्तर माहिती देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मंत्री माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, गोविंद गावडे, नीलेश काब्राल, दीपक पाऊसकर, फिलीप नेरी, मायकल लोबो, आमदार अलिना साल्ढाणा, सुभाष शिरोडकर, नीळकंठ हळर्णकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्य सचिव परिमल राय, अन्य सचिव, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, भाजप संघटनमंत्री सतीश धोंड आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार त्यागी यांची खास उपस्थिती
मडगाव येथे लोहिया मैदानावर झालेल्या लोहिया जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले लोकसभा सदस्य उत्तर प्रदेशातील खासदार के. सी. त्यागी यांचीही या कार्यक्रमास खास उपस्थिती होती.
प्रारंभी सरकारच्या दोन वर्षांच्या कार्याचा आढावा घेणारी ऑडिओ व्हिज्युअल दाखविण्यात आली. तसेच याच कार्यावर आधारित पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
स्वागतपर भाषणात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली गोवा विकासाच्या बाबतीत कुठेच कमी पडलेला नाही, असे सांगून या भरीव आणि चौफेर कामगिरीबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.