मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोना संकटाच्या काळात राज्यात प्रत्येक वर्गातील नागरिकांना अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. अशावेळी आत्महत्येसारखे प्रकार आता घडताना दिसत आहेत. राज्यात एकाच दिवशी शेतकरी, युवक आणि एका कलाकाराने आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आत्महत्येच्या प्रकारानंतर सरकारवर गंभीर आरोपही केलाय.
”राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्येचा मार्गावर असताना ठाकरे सरकार काय करतय, तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या १.प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या २. एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्निल लोणकरची आत्महत्या ३. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या. मात्र राज्य सरकारची प्राथमिकता काय तर BDD चाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव.” असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्य़े म्हटलं आहे.
कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी वाकड परिसरातील फ्लॅटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. तसेच, पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे, चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.