मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती : प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट! : आरोग्य यंत्रणेत आवश्यकतेनुसार भरती
वार्ताहर / कुडाळ:
कोरोनाची दुसरी लाट अपेक्षेपेक्षा भयानकतेने आली आहे. सध्या रुग्णसंख्येत वाढ कमी होत आहे. यातून कसेबसे निभावलो. सध्या ऑक्सिजनची आवश्यकता मोठय़ा प्रमाणात भासत आहे. राज्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट तयार करून रुग्णालये स्वयंपूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या या लाटेविरोधात लढा देण्यासाठी आरोग्य व्यवस्था वाढविली. यापुढेही डॉक्टर आणि कर्मचाऱयांची आवश्यकतेनुसार भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चिपी-परुळे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चिपी विमानतळ येथे आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व प्रदेश सचिव संघटक काका कुडाळकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते तसेच अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
किनारपट्टीवर सुरक्षेसाठी कायमस्वरुपी उपाययोजना!
ठाकरे म्हणाले, वादळामुळे जे नुकसान झाले आहे. त्याची रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वस्तुस्थितीची माहिती घेतली आहे. ज्यांचे-ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना जास्तीत-जास्त भरपाई दिली जाईल. आता दरवर्षी ही वादळे यायला लागली आहेत. गेल्यावर्षीच्या वादळापेक्षा याचा प्रभाव फार जाणवला. नुकसान जास्त झाले. अशी वादळे येत राहतील. त्यासाठी किनारपट्टीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने काही कायमस्वरुपी गोष्टी कराव्या लागतील. त्या अनुषंगाने काही प्रस्ताव राज्याकडे येतील, त्यांना मंजुरी दिली जाईल. जे प्रस्ताव केंद्राकडे आहेत, त्यासाठी पाठपुरावा करू.
तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन रोज आवश्यक
कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये रुग्णसंख्या मागच्या वेळेपेक्षा कमी दिसत असली, तरी आपण यावेळी कसेबसे निभावलो. रुग्णसंख्या कमी वाटत असली, तरी ऑक्सिजनची आवश्यकता भासली. सत्तर ते ऐशी टक्के कोरोना रुग्णांना गंभीर लक्षणे नव्हती, तरीही राज्यात रुग्णांना ऑक्सिजन बेड कमी पडले. राज्यात प्रतिदिन बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. या लाटेत 80 हजार रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत होती. ती आता सत्तर हजारच्या आसपास आली आहे. ‘मिशन ऑक्सिजन’मध्ये राज्यात तीन हजार मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन वाढविला पाहिजे, असे त्यांनी सांगून लॉकडाऊन कधी उठविणार, हा प्रश्न नाही. ते कधीही उठवू शकतो. पण प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. घरातही मास्क वापरणे अनिवार्य आहे, असे ते म्हणाले.
आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी करणार
आरोग्य यंत्रणेत डॉक्टर व कर्मचारी अपुरे आहेत. त्यांची भरती प्रक्रिया केली जाईल. शहर व ग्रामीण भागामध्ये फरक आहे. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
जूनमध्ये लसीकरणाचा वेग वाढविणार
राज्यात 18 ते 44 वयोगटातील सहा कोटी जनता आहे. प्रत्येकाला कोविडचे दोन डोस याप्रमाणे बारा कोटी लसींची आवश्यकता आहे. तेवढे लसीकरण करण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली आहे. सध्या लसीचा पुरवठा होत नाही. जूनच्या पहिल्या आठवडय़ात तो पुरवठा व्यवस्थित झाल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढवू, असे त्यांनी सांगितले.
अंदाज घेऊन पुढील धोरण ठरविणार
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये बाधितांमध्ये ज्येष्ठांची संख्या जास्त होती. आता दुसरी लाट ही युवा व मध्यम व्यक्तींमध्ये, तर तिसऱया लाटेमध्ये लहान मुलांमध्ये शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा अंदाज घेऊन पुढील धोरण ठरविले जाईल, असे ते म्हणाले. दहावी-बारावी परीक्षेबाबत दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
..नंतरच विमानतळ सुरू करण्याची तारीख जाहीर करू!
चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, यापूर्वी अनेक तारखा जाहीर झाल्या. एपीआय समिती 25 मे रोजी आपला अहवाल केंद्राला सादर करणार आहे. त्यानंतर डीजीसीएकडून रनवेची पाहणी केली जाईल. तो अहवाल आल्यानंतरच विमानतळ सुरू करण्याची तारीख जाहीर करू, असे ठाकरे यांनी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी तेथील रनवेची पाहणी करीत आयआरबी कंपनीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर व अन्य अधिकाऱयांकडून माहिती घेतली. काही सूचनाही केल्या.