वार्ताहर/ वाठार किरोली
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये गावपातळीवर ग्रामसमित्या स्थापन केल्या आहेत. शासनाने दिलेल्या सूचना लोकांपर्यंत पोहचवणे. परराज्यातून, परजिह्यातून आलेल्या लोकांना नियमांची अंमलबजावणी करत विलगिकरण कक्षात दाखल करण्याचे काम ग्रामसमित्या करत आहेत त्यामुळे ग्रामसमितीचे अध्यक्ष असणारे मा.सरपंच यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.त्यामुळे लोक त्यांच्या थेट संपर्कात येत असतात.यामुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सरपंच यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन तथा सातारा जिह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
या मागणीची दखल सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा घडवून आणत याबद्दल मागणी केली.या विमा कवचाचा फायदा राज्यातील 27500 सरपंचांना मिळणार आहे. प्रत्येक गावातील सरपंचांचा 50 लाख रुपयांचा विमा या माध्यमातून निघणार आहे. ग्रामीण भागामध्ये सरपंच हे सध्याच्या कोरोना च्या लढाईत अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. ते आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे असे नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले. सरपंचांच्या विमाकवचाबद्दल मुख्य सचिव अजोय मेहता हे सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश देणार आहेत. याविषयीची मागणी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले व सहकायानी केली होती, त्यांनी नामदार बाळासाहेब पाटील यांनी विशेष लक्ष घातल्यामुळेच सरपंचांची मागणी पूर्ण झाली असल्याचे सांगितले.