कोल्हापूर : प्रतिनिधी
कोरोनानंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. परंतू वसतिगृह सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठ अधिविभाग व महाविद्यालयात उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे वसतिगृह लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी पुढे येत आहे. यासंदर्भात बोलताना येत्या आठ दिवसात राज्यातील सर्व वसतिगृहे सुरू होतील. तसेच शिवाजी विद्यापीठातील सुवर्ण महोत्सवी वर्षातील निधीसंदर्भात दोन दिवसात बैठक घेणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
युवा सेनेच्या गडकिल्ले बक्षिस वितरणापुर्वी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, महाविद्यालय सुरू झाली परंतू वसतिगृह सुरू नसल्याने विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय होत नाही. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालक धनराज माने आणि राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची समिती नेमली आहे. ही समिती अभ्यास करून आठ दिवसात वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेईल.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच राज्यातील 2088 प्राध्यापक भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू होतोय. दुसऱया टप्प्यात उर्वरीत एक हजार प्राध्यापकांची भरती केली जाईल. त्याचबरोबर तासिका तत्वावर काम करणाऱया प्राध्यापकांना चांगले मानधन वाढवून देणार आहे.नागरिकांनी गडकिल्ल्यांचा इतिहास संवर्धन केला पाहिजे. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱयांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरांबर चर्चा करावी. चर्चेतून निश्चि मार्ग निघतो. महाविकास आघाडी सरकार एस. टी. कर्मचाऱयांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढेल. परंतू आपल्या आंदोलनामुळे जनसामान्याचे हाल होत आहेत, याची जाणीव त्यांना व्हायला हवी.