प्राधिकरणाचे सहकार विभागाला आदेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
कट ऑफ डेटच्या कचाट्यात सापडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील अडथळा दूर झाल्यानंतर 15 फेब्रुवारीपासून आहे त्या टप्प्यावरुन निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बुधवारी दुपारी काढले. यामुळे जिल्ह्यातील गोकुळची प्रारुप यादी प्रसिद्ध व जिल्हा बँकेचे ठराव सोमवारपासून सुरु होणार आहेत. दरम्यान औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णया विरोधात बीड, परभणी, नांदेड जिल्हा बँकानी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरु केली आहे.
सहकारी संस्थांच्या `कट-ऑफ डेट’ ठरवण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा, असे नमुद करत औरंगाबाद खंडपीठाने चार बँकांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर निवडणुका घेण्यास हरकत नाही, असा मंगळवारी निर्णय दिला. या आधारे प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यातील निवडणूक घोषीत करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. राज्य प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी हे आदेश काढले आहेत.