कोरोनाच्या वाढत्या संसगामुळे सहकार विभागाचा निर्णय
प्रतिनिधी/ कराड
कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने व राज्यात अंशतः लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 6 एप्रिलला ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तथापि ज्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे, त्या संस्था वगळून उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम 18 मार्च 2020 ला सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतरही संसर्ग टाळण्यासाठी 17 जून, 28 सप्टेंबर, 31 डिसेंबर 2020, 16 जानेवारी व 24 जानेवारीला निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही मुदत 31 मार्च 2021 अखेर होती. मात्र सद्यस्थितीत पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्यांना या आदेशातून वगळले आहे. ज्या संस्थांची निवडणूक होणार आहे, त्यांच्या निवडणुका कोविड विषयक निर्बंधांचे पालन करून घेण्यात याव्यात, असेही सहकार विभागाने सूचित केले आहे. सातारा जिल्हय़ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह महत्वपूर्ण संस्थांच्या निवडणुका या आदेशामुळे ऑगस्टपर्यंत पुढे जाणार आहेत.