इचलकरंजी / प्रतिनिधी:
कोरोनामुळे एखाद्या रास्तभाव दुकानदाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत म्हणून ५० लाख रुपये द्यावे, धान्य वाटप करताना प्रति क्विंटल दीड ते एक किलो घट येते. ती घट ग्राह्य धरण्यात यावी. सरकारी धान्य गोडावूनमधून धान्य दुकानदारांना ५० किलो ८०० ग्रॅम वजनाची पोती देण्यात यावी, अशा अन्य मागण्यासाठी राज्यातील सुमारे ५५ हजार धान्य दुकानामधून १ मेपासून धान्य वाटप बंद करण्यात येणार आहे.
धान्य वाटप बंदची हाक अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने केली असून, या बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी इचलकरंजी शहर रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने शहर पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शहर रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब मुजावर, जिल्हा कार्याध्यक्ष दिनकरराव पाटील, इचलकरंजी शहराध्यक्ष पांडूरंग सुभेदार, माजी नगरसेवक दिपक ढेरे, अन्वर सिंकदर मोमीन, गुंडा फगडे, उत्तमराव पाटील, आनंदा पोवार, नामदेवराव पाटील आदीच्या सह्या आहेत.