सामाजिक अंतर, मास्क न वापरणाऱयांवर कारवाई : मुख्यमंत्री
प्रतिनिधी / पणजी
राज्यात काही दिवसांपूर्वी लागू करण्यात आलेले 144 कलम मागे घेण्यात आले असून सभा, मेळावे, समारंभ, बैठका टाळा आणि गर्दी करु नका, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. सामाजिक अंतर, मास्कचे पालन न करणाऱयांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. खासगी कार्यक्रमांना 50 ते 100 जणांनाच प्रवेश देण्याचे ठरवण्यात आले आहे. सध्या तरी लॉकडाऊन किंवा रात्रीची सचारबंदी लागू करण्याचा विचार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली.
लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी नाही
ते म्हणाले की, राज्यात सध्या तरी कसलेच निर्बंध नाहीत परंतु कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी टाळावी आणि ती करु नये. मेळावे, कार्यक्रम, सभा करु नयेत. सर्वांनी सामाजिक अंतरांचे पालन करावे तसेच मास्क घालावेत. लोकांनी कोरोनाचे नियम मोडले तर कारवाई करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी आणि त्यासाठी जागृती करावी. राजकीय नेत्यांनी लोकांना त्या करीता प्रोत्साहित करावे असे सांगून सध्या तरी लॉकडाऊन किंवा रात्री संचारबंदी लावण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
लसीकरण, बेड वाढविण्यावर भर
आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक आल्तिनो – वनभवन येथे झाली. त्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव परिमल रॉय, गोमेकॉचे डिन शिवानंद बांदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. कोरोना स्थितीवर चर्चा करण्यात आली व आढावा घेण्यात आला. लसीकरण – कोरोनाचे बेड वाढवण्यावर भर देण्यात येणार असून कोरोनाचे विविध प्रकार शोधण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री गोमेकॉत आणण्याचा विचार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या बैठकीत बोलून दाखवला.