सेरो सर्वेक्षणातून स्पष्ट : 6,585 जणांची करण्यात आली होती तपासणी : मंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील 16.4 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिजैविके आहेत. सेरो सर्वेक्षणातून ही समाधानकारक बाब समोर आली आहे, अशी माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. विधानसौध येथे पत्रकार परिषदेत ते बोलत
होते.
मुंबई, पुणे, दिल्ली शहारांमध्ये सेरो संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, कर्नाटकात सर्व 30 जिल्हय़ांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ातील आठही विभागांचा समावेश आहे. राज्यात एकूण 16 हजार 585 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापूर्वी आणि सर्वेक्षणादरम्यान राज्यात कोरोनाची बाधा झालेल्यांचे प्रमाण 27.3 टक्के म्हणजेच 1 कोटी 93 लाखांपेक्षा अधिक होते. तर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण केवळ 0.05 टक्के इतके होते, अशी माहिती त्यांनी दिली.
कमी जोखमीचे, मध्यम जोखमीचे आणि अधिक जोखमीच्या कोरोनाबाधित व्यक्ती याप्रमाणे वर्गीकरण करून सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर शरीरात प्रतिजैविके तयार होतात. प्रतिजैविके असणारे आणि कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा शोध घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 15 हजार 642 जणांपैकी प्रतिजैविके असणाऱयांचे प्रमाण 16.4 टक्के आहे.
दिल्लीत हे प्रमाण 29.1 टक्के, मुंबईत 16 टक्के, पुण्यात 36.1 टक्के, इंदोरमध्ये 7.8 टक्के, पॉन्डिचेरीत 22.7 टक्के आणि चेन्नईत 32.2 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविके असल्याचे आढळून आले आहे. 3 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे, असेही ते म्हणाले.
दिवाळी संबंधी लवकरच मार्गसूची
डिसेंबर अखेरीस आणि मार्च महिन्याच्या शेवटी आणखी एकेक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांवर गेले आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवाय दिवाळी साजरी करण्यासंबंधी अहवाल देण्याची सूचना तज्ञांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.
सर्वेक्षण..
राज्यात 27.3 टक्के जणांना कोरोनाची लागण
डिसेंबर अखेरीस, मार्च महिन्यातही होणार सर्वेक्षण
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांवर