बँकिंग अधिकाऱयांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती : लाभ घेण्यासाठी उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / पणजी
केंद्र सरकारने अर्थ व्यावस्थेला उभारी देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजचा गोव्याला लाभ मिळावा व उद्योगाना उभारी मिळावी यासाठी काल शुक्रवारी राज्यस्तरीय बँकांच्या अधिकाऱयांसोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेतली. राज्यातील सुमारे वीस हजार उद्योगांना अतिरिक्त 20 टक्के कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. पात्र असलेल्या सर्व उद्योगांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
गोव्यात 20 हजार एमएसएमई उद्योग आहेत. या उद्योगांना या पॅकेजचा लाभ मिळू शकतो. या पॅकेजबाबत बँकांच्या अधिकाऱयांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. जर बँका कर्ज देण्यास मागेपुढे होत असेल तर सरकारला कळवावे. सरकार मदत करायला तयार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
टाळाटाळ झाल्यास रिझर्व्ह बँकेला कळवावे
गोव्याला केंद्र सरकारच्या पॅकेजचा मोठा लाभ मिळविणे शक्य आहे. जे उद्योग लाभ घेण्यास पात्र आहे त्यानी लाभ मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे ज्यांनी कर्जे घेतलेली आहेत व कर्जाचे हप्ते फेडले जातात त्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय 20 टक्के कर्ज मिळणार आहे. एखादी बँक कर्ज द्यायला टाळाटाळ करीत असेल तर रिझर्व्ह बँकेला याबाबत कळवावे. रिझर्व बँक आवश्यक त्या सूचना देऊन कर्ज द्यायला लावेल, असे रिझर्व बँकेने स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बांधकाम क्षेत्रासाठीही याचा लाभ मिळणे शक्य आहे. कृषी तसेच पर्यटन क्षेत्रासाठीही याचा मोठा लाभ मिळविणे शक्य आहे. गोव्यातील पर्यटन क्षेत्र अव्वल दर्जाचे करण्यास मदत होईल. गोवा हे नंबर एकचे पर्यटन क्षेत्र म्हणून पुढे येईल याबद्दल आपल्याला खात्री आहे. जर एखाद्या बँकेने कर्ज देण्यास नकार दिला तर अर्जदाराने सरकारला संपर्क करावा. सरकार रिझर्व बँकेकडे संपर्क करून तोडगा काढणार असेही मुख्यमंत्री म्हणाले.