प्रतिनिधी/ सातारा
राज्यातील सहकार क्षेत्र टिकले पाहिजे, वाढले पाहिजे, यासाठी आमचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत आहे. राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकारही शेतकरी हितासाठी काम करत आहे. राज्यात यावर्षी सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढले आहे. परिणामी शेतामध्ये उभा असलेला ऊस गाळपासाठी गेलाच पाहिजे आणि साखर कारखाने ही त्यासंदर्भात ठोस भूमिका घ्यायला हवी, असे स्पष्ट धोरण शरद पवार यांनी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना 516 कोटी रुपयांची थकहमी दिली असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री व सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिह्यातील भुईंज (ता.वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची सत्यस्थिती बिकट असून कारखाना यावर्षी सुरू होईल का नाही याची शाश्वती नाही. या अनुषंगाने आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँक संचालक नितीन पाटील तसेच शेतकरी सभासदांनी शुक्रवारी सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेवून कारखान्याची परिस्थिती विशद केली. यावेळी पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सहकार क्षेत्राच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकार सतर्क असल्याचे स्पष्ट केले.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्यातील सहकार क्षेत्राच्या अनुषंगाने आणि साखर कारखान्याच्या संदर्भात ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात सहकार विभागाला सूचना केली आहे. राज्यातील साखर कारखाने वाचले पाहिजेत, अशी भूमिका शरद पवार यांची आहे. राज्यात यावर्षी पाऊसही चांगला झाल्याने परिणामी ऊस क्षेत्र वाढले आहे. हा ऊस कोणत्याही परिस्थितीत गाळपासाठी कारखान्यापर्यंत पोहचला पाहिजे, असेही ही शरद पवार यांनी सहकार खात्याला सूचित केली आहे. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना 516 कोटी रुपयांची थकहमी दिली आहे.
यामध्ये सातारा जिह्यातील दोन सहकारी साखर कारखाने आहेत. यापैकी किसनवीर सहकारी साखर कारखान्याला 18.98 कोटी तर खंडाळा सहकारी साखर कारखान्याला 11.60 कोटी असा एकूण 30.58 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये आम्ही राजकारण आणलेले नाही. विरोधकांच्याही सहकारी साखर कारखान्यांना थकहमी दिलेली आहे. काही कारखान्यांनी तर ही रक्कम घेतली नाही. त्यांनी कारखान्यातून साखर विक्री झाल्यामुळे बँकांनाही त्यांना सहकार्य केले असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.