मुख्यमंत्र्यांची माहिती
गोव्यातून अन्य राज्यातील आपापल्या गावात जाण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक कामगारांनी नोंदणी केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. त्यांना घेऊन जाणारी पहिली रेल्वे येत्या दोन – तीन दिवसात गोव्यातून निघेल, असेही ते म्हणाले.
संपूर्ण कामगारवर्ग गोव्यातून नाहीसा झाल्यास त्याचे विपरित परिणाम गोव्यातील विकासकामे व अन्य प्रकल्पावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यातील विविध कामे अडून राहतील व सर्वांचीच गैरसोय होणार अशी चिन्हे दिसत आहेत.
गोव्यातून विविध राज्यात आपआपल्या गावी जाण्यासाठी सुमारे 80 हजार कामगारांनी नोंदणी केली असून रेल्वे मंत्रालयाकडून त्यांच्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्याची माहिती जाहीर करण्यात येईल. गोव्यातील फक्त एकाच रेल्वे स्थानकावरून संबंधित राज्यातील एकाच स्थानकावर अशी थेट रेल्वेसेवा देण्यात येणार आहे. ती मध्ये कुठेही थांबणार नाही. ज्यांना इतर राज्यात स्वतंत्र वाहनाने जायचे असेल तर ते अनुमती घेऊन जाऊ शकतात, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
कंत्राटदारांनी मजुरांनी गोव्यातच ठेवावे,
संपूर्ण कामगारवर्ग गोव्यातून गेला तर गोव्यातील अनेक कामे अडकून राहतील. अनेक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांची गोव्याला गरज आहे म्हणून त्यांच्या कंत्राटदारांनी त्यांना गोव्यातच ठेवावे, त्यांची व्यवस्था करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. गोवा कायम ग्रीन झोनमध्ये राहावा, कोरोनाचे रुग्ण मिळू नये, सर्वजण सुरक्षित राहावेत म्हणून सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
सर्व खासगी दवाखाने सुरु करावेत
सर्व खासगी दवाखाने सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले असून संबंधीत डॉक्टर्सनी ते सुरू करावेत असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. गोव्यातील नेपाळी लोकांना तसेच राहिलेल्या परदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी त्यांनी पंचायत, पालिका किंवा पोलीस स्थानकात नोंदणी करावी. त्यानंतरच त्यांना परत पाठवण्यावर काही तरी उपाय काढणे शक्य होईल, असे ते म्हणाले.