ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी परतण्यासाठी मोफत एसटी बस सेवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवारपासून या सेवेला प्रारंभ होईल. 17 मे पर्यंत एसटी बसच्या माध्यमातून राज्यात अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी परत जाता येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
परब म्हणाले, राज्याच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना काही अटी आणि शर्तींसह मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात येईल. ज्या नागरिकांना प्रवास करायचा आहे त्यांचे थर्मल स्क्रीनिंग आणि तपासणी करुनच प्रवासाची परवानगी दिली जाईल.
एसटीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये, म्हणून एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशांनाच प्रवास करता येईल. सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून प्रत्येक सीटवर एकच प्रवासी बसेल. राज्यातील कोणत्याही रेड झोन अथवा कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तीला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही, असेही परब यांनी सांगितले.