मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आपण विविध विकासकामे, प्रकल्प आणणे याकडेच अधिक लक्ष दिले गेले, मात्र राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यामुळे हे सरकार राज्यातील आरोग्य सुविधांचे जाळे मजबूत करण्यावर अधिक भर देणार आहे. तरच आपण तिसऱया लाटेवर समर्थपणे मात करू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरीतील वाढीव बेडच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी केले.
येथील महिला रूग्णालय टप्पा-2 येथील 200 खाट व ओणी-राजापूर येथील 30 खाटांच्या कोविड समर्पित रूग्णालयाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी ऑनलाईनव्दारे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री ऍड. अनिल परब उपस्थित होते तर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदी उपस्थित होते.
गेले वर्षभर आरोग्यविषयक सुविधा वाढवण्याचे आपण सर्वांनीच प्रयत्न केले. पहिल्या लाटेतून अनेक गोष्टींचा अनुभव घेताना आरोग्य सुविधा बळकटीकरणाकडे शासनाने लक्ष दिले. याला सर्वांनी चांगलेच सहकार्य केले. मात्र यंदा लॉकडाऊन काळात काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी गांभिर्यांनी पाळले नसल्याची दिसत आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये जी परिस्थिती होती, ती आता मे महिन्यात निर्माण झाली आहे. आता निर्बंध कडक करण्यात येतील, याचे पालन सगळय़ांना करावे लागेल. यासाठी प्रशासनाने नागरिकांना समजावून सांगून ही अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. याचा निर्णय आज-उद्या होईल, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
सुपर स्पेशालिस्ट हॉस्पीटलबाबत सकारात्मक निर्णय
रत्नागिरी महामार्गावर लगत सुपर स्पेशालिस्ट हॉस्पीटल उभारायचेच आहे. तसा प्रस्ताव द्या, या बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे रत्नागिरीतील लोकप्रतिनिधींच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. कोरोना या संकटाने आपले डोळे उघडले आहेत. विकासाच्या प्रकल्पाकडे बघताना आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. पूर्ण राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे मजबूत करणे, आता महत्वपूर्ण असल्याचे ठाकरे म्हणाले.
महिलांसाठी कोरोना रूग्णालय संकल्पना राज्यातील वेगळा प्रयोग
महिलांचे रूग्णालय ही संकल्पना वेगळी संकल्पना आहे. राज्यातला हा वेगळा प्रयोग आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन व संकल्पनेचे कौतुक असल्याचेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले. म्युकरमायकोसिसचा डेटा तयार केला पाहिजे. कोविडमधून बरे झाल्यानंतर पुढील 3 महिने काळजी घेणे गरजेचे आहे. म्युकरमायकोसिसचा रूग्ण आला तर त्याची चौकशी केली पाहिजे, त्याचा डेटा जमा केला पाहिजे, यावर इंजेक्शन उपलब्ध होते. थोडा तुटवडा असल्याचेही ठाकरे त्यांनी सांगितले.
निर्बंधातही रूग्ण वाढताहेत हे दुर्दैव
लॉकडाऊन पुढे वाढवावा का, या बाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. निर्बंधातही रूग्ण वाढत असतील तर निर्बंधाला काही अर्थ नाही. कटाक्षाने लक्ष देवून नागरिकांना नियम पाळायला लावणे गरजेचे आहे. दमदाटी न करता समजून सांगा. गेल्यावेळी गणेशोत्सवानंतर लाट वाढली होती. यावेळी काही पटीत वर गेलो आहोत. सण वार नसतानाही ही परिस्थती असल्याचेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात आता ‘माझा डॉक्टर’ उपक्रम
जनजागृती व जनसहभाग महत्वाचा आहे. ‘माझा डॉक्टर’ उपक्रम हाती घेण्यात आला. त्यामुळे या लाटेवर मात करण्यासाठी डॉक्टरांचा सहभाग वाढवा. सुविधा वाढवताना प्राधान्याने ऑक्सिजन सुविधा वाढवण्याकडे प्रकर्षाने लक्ष द्या. शक्य असेल तिथे ऑक्सिजन प्लॅंट सुरू करा तरच तिसऱया लाटेला आपण समर्थपणे पत्करू शकतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संघमित्रा फुले यांनी केले.
‘तौक्ते’त जिल्हा प्रशासनाची कामगिरी कौतुकास्पदः मुख्यमंत्री
कोरोनाचे संकट जिल्हय़ात वाढत असतानाच तौक्ते चक्रीवादळाची किनारपट्टीवर जोरदार धडक बसली होती. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व त्यांच्या टीमने केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी आवर्जून सांगितले.