मंगळवारी 30,309 नव्या बाधितांची नोंद : 525 बळी
बेंगळूर : मागील तीन दिवसांपासून राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच दिलासादायक वृत्त समोर आले आहे. मंगळवारी नव्या रुग्णांच्या तुलनेत संसर्गमुक्त होणाऱयांचे प्रमाण दुप्पट आहे. दिवसभरात संसर्गमुक्त होण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. मागील चोवीस तासांमध्ये राज्यात 58,395 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दिवसभरात केवळ 30,309 नव्या बाधितांची भर पडली आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यात 525 रुग्णांचा बळी गेला आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मंगळवारी मात्र, नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होते. ही बाब दिलासादायक असली तर कोरोनाबळींचा आकडा मात्र अधिक आहे. राज्यात मंगळवारी 93,247 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 32.50 टक्के इतके होते. आरोग्य खात्यानशे प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 22,72,274 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर संसर्गमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 16,74,487 इतकी आहे. आतापर्यंत एकूण 22,838 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 5,75,028 इतकी आहे. सक्रिय रुग्णसंख्येत कर्नाटक देशात अग्रस्थानी आहे.