मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात दिवसा किंवा रात्री कर्फ्यु जारी करण्याचा प्रस्ताव नाही. सभा-समारंभांना कोणतेही बंदी नाही. मात्र, मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे सक्तीचे आहे. नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये. खबरदारी उपाययोजनांद्वारे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात येईल. सभागृहासह चार भिंतीच्या आतील कार्यक्रमांमध्ये कोविड मार्गसूचीचे पालन करणे अनिवार्य आहे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट आणखी तीव्र होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजिलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेलया बेंगळूर शहर, बिदर आणि गुलबर्गा जिल्हय़ांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. या जिल्हय़ांमधील आरोग्य तपासणी, कोविड चाचण्या, कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यासह कोविड नियंत्रणासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात येतील, असे येडियुराप्पा म्हणाले.
राज्यात आवश्यक असलेल्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील. बेंगळूरमध्ये तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील. राज्यात 3,500 हून अधिक लसीकरण केंद्रांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियान आणखी गतीमान करण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी देखील जनतेमध्ये भीती निर्माण करू नका, अशी सक्त सूचना केली आहे. राज्यात आवश्यकतेनुसार लस पुरवठा करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे, असे येडियुराप्पा म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांकडूनही स्पष्टीकरण
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेची भीती वाढली असली तरी राज्यात लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यु जारी करण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. लॉकडाऊन, सीलडाऊन करण्याची वेळ आलेली नाही. परंतु, नागरिकांच्या चलनवलनाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला रुग्ण आढळून आल्यानंतर लस उपलब्ध नव्हती. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराचा अनुभवनही नव्हता. मात्र, आता लस आणि चिकित्सा पद्धतही माहिती झाली आहे. त्यामुळे आपण रुग्णसंख्या नियंत्रण आणि रुग्ण मृत्यूदर कमी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असेही डॉ. सुधाकर यांनी स्पष्ट केले.
कोविड चाचण्यांची संख्या लाखापर्यंत वाढविण्याची सूचना
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत कोविड चाचणीसाठी दिलेले लक्ष्य 1 लाखापर्यंत वाढविण्याची सूचना राज्य आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याने दिली आहे. आरोग्य खात्याने बुधवारी यासंबंधीचा आदेश दिला असून दिवसात आरटी-पीसीआर आणि आरएटी कोविड -19 चाचण्या 1 लाखापर्यंत वाढविण्याच लक्ष्य दिले आहे. कोरानाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दिवसभरात 65 हजार ते 70 हजारापर्यंत चाचण्या केल्या जात होत्या. आता संसर्ग वाढल्यामुळे चाचण्यांची संख्याही वाढविण्यात येत आहे.
…तर कारवाई अनिवार्य
राज्यात मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. मात्र, जनतेने मनाप्रमाणे वागताना मास्कचा वापर न केल्यास कारवाई करणे अनिवार्य आहे. 50 टक्के लोकांना मास्क वापरण्याचाच विसर पडला आहे. त्यामुळे आधी जागृती केली जाईल नंतर दंड आकारला जाईल.
– येडियुराप्पा