सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर : आठजणांचे अहवाल येणे बाकी : राज्यात 581 जणांचे विलगीकरण
- गोव्यातील एकूण कोरोनाबाधित 46
- सध्या उपचार घेणारे कोरोनाबाधित 39
- पूर्णपणे बरे झालेले रुग्ण 7
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव येथील कोविड-19 हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रूग्णांची संख्या मंगळवारी 39 वर पोचली आहे. सोमवारी ती 35 होती. सोमवारी कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने तो दिवस गडबडीचाच राहिला होता. मंगळवारी दिवसभरात चार रूग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कोविड हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली.
तपासणी केलेल्या अजून 8 रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे. कोरोनाबाधितांशिवाय एकूण 591 जणांना राज्यात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सुरुवातीपासूनचे रुग्ण जमेस धरुन गोव्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 46 आहे. यातील 7 जण यापुर्वीच पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या उपचार घेणाऱयांची संख्या 39 आहे.
रेल्वे प्रवाशांमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
राजधानी एक्सप्रेसमधून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोना बाधिताची संख्या वाढली आहे. कर्नाटकातून आलेल्यांमध्ये दोघे कोरोना संक्रमित होते तर महाराष्ट्रातून आलेल्याची संख्या जास्त होती. पश्चिम बंगालमध्ये बार्ज सुपूर्द करण्यासाठी गेलेल्या दोघांचा यात समावेश आहे.
गोमेकॉत व्हायरलॉजी लॅबमधून अद्याप काही संशयिताच्या चाचण्यांचा अहवाल यायचा बाकी असून त्यानंतरच एकूण गोव्यातील चित्र स्पष्ट होणार आहे. डॉ. एडविन गोम्स यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून सर्व रूग्णांकडून उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देण्यात आली. ईएसआयचे प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई हे डॉ. गोम्स यांना सहाय्य करीत आहेत.
आता प्रतीक्षा खलाशांची
विदेशात अडकून पडलेल्या खलाशांना पुन्हा गोव्यात आणण्यास मान्यता मिळाली आहे. त्यात इटलीहून खास विमान गोव्यात येत असून या खलाशांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याला कोविड-19 हॉस्पिटलचे डॉक्टर व नर्सेसही अपवाद राहिलेल्या नाहीत. इटलीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असल्याने, गोव्यात येणारे हे खलाशी किती सुरक्षित आहेत, हे त्यांची चाचणी घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
सध्या उपचार घेणारे रुग्ण गोव्याबाहेरुन आलेले असले तरी त्यांच्यापासून इतरांना धोका आहे. उपचारानंतर ते पुन्हा पॉझिटिव्ह झाले, ते लोकांमध्ये मिसळले तर ते इतरांसाठी धोकादायक ठरणार नाही काय, असा सवाल लोकांत उपस्थित केला जात आहे.