छळ असहय्य झाल्याने 52 महिलांनी संपविले जीवन
प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे क्लोजडाऊनमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे पोषण करण्याची समस्या महिलांसमोर उभी राहिली आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावरील अत्याचारातही वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्याच्या विविध भागांमध्ये हुंडाबळींची प्रकरणे वाढत असून एकूण 458 हुंडाबळीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत तर हुंडाबळीमुळे 52 महिलांचा मृत्यू झाला आहे.
एकूण 458 प्रकरणांमध्ये 52 महिलांनी छळ असहय्य होऊन आपले जीवन संपविले आहे. पती आणि अन्य सदस्यांचा छळ सहन न झाल्याने 23 जणींचा मृत्यू झाला आहे. 16 जणींनी नदीला जवळ केले आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत एकूण 574 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर जनता कर्फ्यू लागू झाल्यापासून 159 हून अधिक हुंडा मागण्याबद्दलच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पैसे, सोने, चांदी, संपत्ती, वाहन, बंगला याची मागणी महिलांकडे केली जात आहे. ती मागणी पुरवली नसल्याच्या कारणास्तव अनेकींना घराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. सतत हुंडय़ाच्या मागणीमुळे अनेक विवाहितांची घरामध्ये घुसमट होत आहे. हुंडय़ाची मागणी करणाऱयांमध्ये केवळ अशिक्षितांचाच भरणा आहे असे नाही तर आयटी कंपनीमध्ये काम करणाऱया पुरुषांनीसुद्धा हुंडय़ासाठी पत्नींचा छळ चालविला आहे.
पत्नी कमावती असूनही तिच्या पैशावर तिचा अधिकार नाही. या शिवाय पैशाच्या हव्यासापोटी परत तिने माहेरहून पैसे आणावेत, अशी मागणी पती करत आहेत. वास्तविक हुंडा घेणे आणि हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा आहे. हुंडाबळी झाल्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवून शिक्षा ठोठावली जाते. हुंडा घेतल्याच्या गुन्हय़ासाठी पाच वर्षांचा कारावास होऊ शकतो. हुंडय़ाची मागणी केल्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. असे असूनही हुंडाबळींची संख्या वाढत आहे, हे दुर्दैव आहे असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रमिळा नायक यांनी म्हटले आहे.
राज्यात 2017 पासून नोंद झालेल्या तक्रारींची आकडेवारी
वर्ष | तक्रारी | मृत्यू |
2017 | 1532 | 206 |
2018 | 1524 | 198 |
2019 | 1716 | 189 |
2020 | 1487 | 177 |
2021 | 458 | 52 |