भीती न बाळगण्याचे शिक्षण खात्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन
प्रतिनिधी/ बेंगळूर
विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनाची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाची असणारी दहावी परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव होत असताना देखील कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना कोणत्याही भीतीशिवाय परीक्षेला हजर होण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
बारावी इंग्रजी परीक्षेवेळी निर्माण झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारीही घेण्यात आली आहे. याकरिता जिल्हा शिक्षणाधिकारी आणि परीक्षा केंद्र प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांमध्ये सॅनिटायझरने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे परीक्षा केंद्राबाहेर आरोग्य कर्मचारी विद्यार्थ्यांची तपासणी करतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये असणारी भीती दूर करण्यासाठी सरकारने परीक्षेसाठी हाती घेतलेल्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती असणारे पत्रक पालकांना वाटप केले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी राज्यभरात 12,974 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधून विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. खासगी शिक्षण संस्थांच्या बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांमध्ये कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ताप, खाकला, सर्दी किंवा कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र आसन व्यवस्था केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी सूचना
प्रत्येक विद्यार्थ्यांने परीक्षा केंद्रावर 1 तास आधी हजर रहावे, आरोग्य तपासणीपूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत, मास्क सक्तीने परिधान करावा, खोकताना/शिंकताना विद्यार्थ्यांनी तोंडासमोर रुमाल धरावा, विद्यार्थ्यांनी परस्परांशी हस्तांदोलन करू नये, परीक्षा केंदातील दरवाजा, खिडकी व इतर कोणत्याही वस्तूंना अनावश्यकपणे हात लावू नये, खाद्यपदार्थ, पिण्यासाठी घरातूनच बाटलीमधून पाणी आणावे, नसल्याने त्यांना 200 मिली बाटलीबंद पाणी परीक्षा केंद्रातून पुरविण्यात येईल, परीक्षा देताना आरोग्यविषयक त्रास जाणवत असेल तर परीक्षा निरीक्षकांना माहिती द्यावी, परीक्षा केंद्रावर येताना आणि परत जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा विविध सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही शिक्षण खात्याने केले आहे.
पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये संधी
कोरोनाचे रुग्ण आढळल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या भागातील 26 परीक्षा केंद्रे अन्यत्र हलविण्यात आली आहेत. शिवाय कोरोना पॉझिटिव्ह असणाऱया 10 विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये होणाऱया पुरवणी परीक्षेवेळी नवे परीक्षार्थी म्हणून संधी देण्यात येईल. या विद्यार्थ्यांमध्ये बेळगाव जिल्हय़ातील चौघांचा समावेश आहे. राज्यात 9 विद्यार्थी संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांना देखील गुरुवारपासून सुरू होणाऱया परीक्षेला बसण्याची मुभा नाही. त्यांना देखील पुरवणी परीक्षेवेळी संधी दिली जाणार आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला पुढील पेपरसाठी हजर राहता येणार नाही. त्यांना ऑगस्ट महिन्यात होणाऱया पुरवणी परीक्षेदरम्यान उर्वरित पेपर देता येतील, अशी माहिती शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी दिली आहे..
अफवांवर विश्वास नको!
सोशल मीडियावर गुरुवारी होणाऱया इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने दहावी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, मंत्री सुरेशकुमार यांनी व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका खोटी आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. काही समाजकंटकांनी विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी खोटी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या प्रकरणी संबंधितांचा शोध घेऊन सायबर पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. तशी सूचना शिक्षण खात्यातील अधिकाऱयांना दिल्याचे सांगितले.