मंगळवारी 38 हजारहून अधिक कोरोनामुक्त : 588 रुग्णांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आला असून कोविड चाचण्यांच्या तुलनेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण 21.13 टक्क्यांवर आले आहे. राज्यात मंगळवारी 22,758 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 38,224 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांत 588 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मंगळवारी 1,07,675 कोविड चाचण्या करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे चाचण्यांचे प्रमाण घटले असले तरी संसर्गमुक्तचे प्रमाण वाढले आहे. ही बाब दिलासादायक असली तर मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण मंगळवारी 2.58 टक्के इतके होते.
राज्यात आतापर्यंत 24,72,973 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 20,22,172 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 26,399 रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या 4,24,381 इतकी आहे.