85 टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी हजर :16,850 माध्यमिक शाळा आणि 5,492 पदवीपूर्व महाविद्यालयांचा परिसर गजबजला
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात सोमवारपासून नववी, दहावी तसेच पदवीपूर्वच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील वर्ग सुरू झाले. 2021-22 या शैक्षणिक वर्षाला जुलैपासून प्रारंभ झाला असला तरी कोरोना परिस्थितीमुळे केवळ ऑनलाईनद्वारेच शिक्षण सुरू होते. आता संसर्ग कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग शाळा-महाविद्यालयांमध्ये भरविण्यात येत आहेत. राज्यात सोमवारी 16,850 माध्यमिक शाळा आणि 5,492 पदवीपूर्व महाविद्यालयांचा परिसर विद्यार्थ्यांमुळे गजबजला. सुमारे 25 लाख विद्यार्थी ऑफलाईन वर्गांना हजर झाल्याचे सांगण्यात आले आहे. 80 ते 85 टक्के विद्यार्थी सोमवारी शाग्नळा-महाविद्यालयांत हजर झाल्याचा अंदाज आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यांपेक्षा अधिक असणाऱया मंगळूर, उडुपी, कोडगू आणि चिक्कमंगळूर या चार जिल्हय़ांमध्ये शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. हासन जिल्हय़ात केवळ पदवीपूर्व महाविद्यालये सुरू करण्यात आली. येथे नववी आणि दहावीचे वर्ग पुढील आठवडय़ापासून सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेतील वर्गांमधील हजेरीची सक्ती नाही. त्यामुळे ऑफलाईन वर्ग सुरू असतानाच ऑनलाईन वर्गही चालू असणार आहेत. त्यामुळे शाळेत न आलेले विद्यार्थी घरात राहूनच ऑनलाईनद्वारे हजर होऊ शकणार आहेत.
आठवीपर्यंचे वर्ग भरविण्याबाबत 30 रोजी निर्णय
पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबतही लवकरच निर्णय होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले आहेत. सोमवारी सकाळी बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंबंधी तज्ञांनी अहवाल सादर केला आहे. 30 ऑगस्ट रोजी कोविड तांत्रिक सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत आठवीपर्यंतचे वर्ग भरविण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार आहे.