मुंबई / ऑनलाईन टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पत्रातून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख तसेच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. आता यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. सध्या एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचे आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असे असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतले जाऊ शकते. अशाप्रकारचे घाणेरडं राजाकारण या देशात यापूर्वी झालेले नाही.
अनिल परब, अजित पवार, अनिल देशमुख यांच्याबाबत एक पत्र काल समोर आले आहे. त्या पत्राची सत्यथा काय आहे. याबाबत कोणी सांगू शकत नाही. हे पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्म्य आहेत. त्याच्याविषयी विरोधी पक्षाने स्पष्ट करावे जेलमध्ये आणखी काही व्यक्ती असतात त्या सुद्धा तुम्हाला अडचणीत आणू शकतात हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. तसेचपरिवहन मंत्री अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मी मानतो की खरा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक इतर काही करेल परंतु बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेऊन कधी काही करणार नाही, असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
यासोबतच सध्या झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या बाबतीत काय चालले आहे. महाराष्ट्रात या प्रकारचे दबावाचे राजकारण यशस्वी होणार नाही आणि सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. प्रत्येक परिस्थिशी सरकार बेडरपणे सामना करेल आणि संकटे परतवून लावू असा विश्वास देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.