आणखी तीन दिवस मुसळधार : अनेक जिल्हय़ांत ऑरेंज अलर्ट
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात पावसाचा जोर वाढला असून किनारपट्टी व मलनाड भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणखी तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार असून 18 जुलैपर्यंत उत्तर आणि दक्षिण कर्नाटकासह मलनाड, किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
बेळगाव, धारवाड, कारवार, उडुपी, मंगळूर, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू, शिमोगा, हावेरी, रायचूर, बेंगळूर शहर आणि ग्रामीण जिल्हय़ांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर विजापूर, बागलकोट, बिदर, गुलबर्गा, कोप्पळ, चिक्कबळ्ळापूर, कोलार, रामनगर, तुमकूर आणि यादगिरी जिल्हय़ांमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. या जिल्हय़ांत 64.5 मि. मी. पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
मंगळूर जिल्हय़ातील कुलशेखरनजीक तोकूर रेल्वे मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील अनेक रेल्वे खोळंबल्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱयांनी तातडीने दरड हटविण्याचे काम हाती घेतले.
कावेरी नदीच्या पाण्याची आवक अधिक असल्याने पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे हारंगी जलाशयातील पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ झाली असून जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ दोन फुटांची आवश्यकता आहे. मंगळूर जिल्हय़ात रात्रंदिवस होत असलेल्या संततधार पावसामुळे नद्या तुडूंब झाल्या आहेत.